प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना कधी संपणार… शाळा केव्हा सुरू होणार… विद्यार्थ्यांची सुरक्षितता कशी राखली जाणार… अनलॉकच्या विविध टप्प्यात शाळा बंदच…. शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक प्रणाली जाहीर… ऑक्टोबर अखेर शाळा सुरू होणार नाहीत… अशी चर्चा, सूचना आणि आदेश सातत्याने जाहीर केले जात आहेत. मात्र अखेर पालकांच्या संमतीनंतरच शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे कर्नाटक सरकारने जाहीर केले असून शाळा प्रारंभीच्या निर्णयाचा चेंडू आता पालकांकडे गेला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना केंद्राने शाळा सुरू करण्याबाबतची मार्गदर्शक सूची जाहीर केली. मात्र शाळा सुरू करावी की नाही हा निर्णय सर्वस्वी राज्यातील स्थितीवर अवलंबून राहील, असे नमूद करण्यात आले होते. मात्र राज्यातील कोरोनाची स्थिती विचारात घेऊन पालकांच्या संमतीशिवाय शाळा सुरू करण्यात येणार नसल्याचे सरकारने जाहीर केले आहे. यामुळे पालकांच्या मतांच्या अहवालावरच शाळा प्रारंभाचा निर्णय होणार आहे.
याबाबत पालकांची मते जाणून घेतली असता शिक्षणापेक्षा आरोग्य महत्त्वाचे, शाळेत दाखल केल्यानंतर जबाबदारी कोणाची, सुरक्षिततच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱया उपायांची अंमलबजावणी होईल का? शाळा न घेतलेल्या बऱया, प्रथम मोठय़ा वर्गाच्या शाळा सुरू कराव्यात, अशी मतमतांतरे व्यक्त करण्यात आली आहेत.
लहान मुलांची शाळा सुरू करणे अतिधोकादायक
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीपेक्षा आरोग्य महत्त्वाचे आहे. शाळास्तरावर मुलांची सुरक्षितता राखणे कठीण आहे. अधिक संख्येने मुले एकत्र येतात. शिवाय सामाजिक अंतर राखताना प्रत्येकाकडून त्याचे पालन होईलच असे नाही. यामुळे संसर्गाचा धोका आहे. लहान मुलांची शाळा सुरू करणे तर अतिधोकादायक असून मोठय़ा वर्गाबाबत परिस्थितीनुसार विचार व्हावा, असे मत वर्षा मेलगे यांनी व्यक्त केले.
प्रभावी औषध उपलब्ध होत नाही तोपर्यंत आरोग्य जपणे गरजेचे
कोरोनाच्या स्थितीत अजूनही शाळा सुरू करू नयेत. या रोगावर जोपर्यंत प्रभावी औषध उपलब्ध होत नाही तोपर्यंत आरोग्य जपणे गरजेचे आहे. शाळेत विद्यार्थी गेल्यानंतर त्यांची जबाबदारी कोण घेणार? सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. त्यातही अडचणी आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा मोबाईलकडे कल वाढला असून चिडचिडेपणा व आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. यामुळे शैक्षणिक वाटचालीबाबत द्विधा मनस्थिती असल्याचे मत श्रीदेवी गर्दे यांनी व्यक्त केले.
शैक्षणिक वर्षाबाबत चित्र स्पष्ट होण्याची गरज
मुलगी दहावीला तर मुलगा युकेजीला आहे. कोरोनाच्या स्थितीत शाळा सुरू करताना मोठे वर्ग टप्प्याने सुरू करण्यास हरकत नाही. मात्र लहान वर्गाच्या शैक्षणिक वाटचालीबाबत पर्याय काढणे देखील तितकेच गरजेचे आहे. पालक म्हणून घरी अभ्यास घेतला जात असला तरी शालेय वातावरण घरात मिळणे कठीणच आहे. यामुळे शैक्षणिक वर्षाबाबत आता तरी चित्र स्पष्ट होण्याची गरज असल्याचे सोनल नाईक यांनी सांगितले.
जानेवारीनंतरच परिस्थिती पाहून शाळा सुरू कराव्यात
मार्चपासून शाळा नाहीतच. मात्र ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून त्याला पर्याय काढण्यात आला आहे. मात्र प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा लाभ होतोय का, हे पाहणे देखील गरजेचे आहे. विद्यार्थी शाळेत जातील मात्र त्यांची सुरक्षितता आणि पुन्हा कुटुंबाची सुरक्षितता आणि होणारा परिणाम याचा विचार व्हायला हवा. जानेवारीनंतर परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्यास हरकत नाही. मात्र तत्पूर्वी अभ्यासक्रम कपातीची अंमबजावणी आणि शैक्षणिक वाटचालीबाबत नेमकेपणा असणे गरजेचे आहे.