जागतिक तिरंदाजी स्पर्धेत दीपिकाकुमारीची सुवर्णपदकाची हॅटट्रिक आणि विश्व नेमबाजी स्पर्धेतील मराठमोळय़ा राही सरनोबत हिचा सुवर्णवेध हा भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी ऐतिहासिक क्षणच म्हटला पाहिजे. या दोन्ही सुवर्णकन्यांची ही कामगिरी प्रेरणादायी नि अविस्मरणीय असून, आता टोकियो ऑलिम्पिकमध्येही त्या याची पुनरावृत्ती करतील, अशा आशा बळावल्या आहेत. तिरंदाज दीपिकाकुमारी हिचा प्रवास तसा थक्क करणारा. झारखंडच्या रांचीपासून काही अंतर दूर असलेल्या रातू चाटी गावातून पुढे आलेली ही मुलगी इथवर मजल मारते, हे सारेच अविश्वसनीय होय. गावात दगडाने कैरी, आंबे पाडण्यात दीपिका वाकबगार होती, असे सांगतात. कदाचित यातूनच अचूक वेध घेण्याची हातोटी तिने आत्मसात केली असावी. त्यानंतर बांबूपासून बनविलेल्या धनुष्याने तिने आपले तिरंदाजीतील कौशल्य दाखवून दिले. आज तीच दीपिका सुवर्णपदकाला गवसणी घालताना जगातील अव्वल क्रमांकाची महिला तिरंदाज म्हणून स्थान मिळवते, हे अभिमानास्पद आणि स्फूर्तिदायक म्हणता येईल. दीपिका 2012 व 2016 च्या ऑलिम्पिक स्पर्धेतही सहभागी झाली होती. मात्र त्यात तिला यश मिळाले नव्हते. विश्वचषकासह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजविणारी ही सुवर्णकन्या आज सर्वोत्तम बहरात असल्याचे दिसून येते. महिला एकेरीच्या रिकर्व्ह प्रकारातील अंतिम फेरीत तिने रशियाच्या एलेना ओसीपोव्हा हिच्यावर 6-0 ने गाजवलेली हुकूमत यातूनच तिची मजबूत पकड ध्यानात येते. याशिवाय मिश्र आणि महिला सांघिक प्रकारातही यश मिळवत तिने तिहेरी मुकुट प्राप्त करण्याची किमया केली आहे. हा परफेक्ट अंदाज तिच्याकरिता टर्निंग पॉईंट ठरावा, अशीच अपेक्षा असेल. मिश्र प्रकारात तिने पती अतानू दास यांच्या साथीत पिछाडीवरून मुसंडी मारत पदक प्राप्ती केली. ही वीजिगीषू वृत्ती खेळात महत्त्वाची असते. भारतीय खेळाडू गुणवत्ता असूनही अनेकदा मानसिक कणखरतेत कमी पडत. परंतु, या आघाडीवरही आपण कमी नसल्याचे हे गोल्डन कपल आपल्या खेळातून सिद्ध करते, ही आश्वासक गोष्ट आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा मागील वषी पुढे ढकलण्यात आली. आता या स्पर्धेचे पडघम वाजत आहेत. तिरंदाजीच्या जागतिक रँकिंगमध्ये प्रथम स्थानी झेप घेणाऱया दीपिकाकडून या क्रीडाप्रकारात निश्चित पदकाची आस असेल. हाच परफॉर्मन्स तिने कायम राखला व कोणतेही दडपण न घेता आपला नैसर्गिक खेळ केला, तर यश तिच्यापासून फार दूर नाही. कोल्हापूरच्या राही सरनोबतचे सुवर्णयशही असेच दमदार. राहीने क्रोएशिया विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत 25 मीटर पिस्तूल प्रकारात साधलेला सुवर्णवेध अफलातूनच म्हणायला हवा. ऑलिम्पिक विजेती ऍना कॉरेकारी हीदेखील तिच्यापुढे निष्प्रभ ठरावी यातच सर्व आले. पदक निश्चितीनंतर तिने ऑलिम्पिकच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने केलेले प्रयोग यातून ती किती पुढचा नि वास्तववादी विचार करते, हेच दिसते. सुवर्णपदक जिंकणार याची खात्री झाल्यावर काही तांत्रिक गोष्टींकडे तिने अखेरच्या फेरीत लक्ष दिले. या अशा दृष्टीतूनच खेळातील बारकावे, त्याचे अंतरंग उलगडत असते नि त्यातूनच यश मिळविणे सोपे जाते. पदक मिळविल्यानंतर राहीने व्यक्त केलेली प्रतिक्रियाही अशीच तिच्यातील खेळाबद्दलचा ध्यास सांगून जातो. ऑलिम्पिकपूर्वीची ही अखेरची स्पर्धा असून, त्यातील कामगिरीने आपली पूर्वतयारी योग्य ट्रकवर असल्याची खात्री ती व्यक्त करते. राहीचा एकूणच खेळ वा तिची प्रतिक्रिया बघता आता ऑलिम्पिक हेच तिचे अंतिम लक्ष्य आहे, हे ध्यानात येते. 2008 मध्ये युवा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत क्रीडाजगताचे लक्ष वेधून घेणारी ही नेमबाज असामान्य प्रतिभा लाभलेली क्रीडापटू आहे. आशियाई, विश्वचषकासह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ठसा उमटवून तिने महाराष्ट्राचे व देशाचे नाव उंचावले आहे. कोरोना काळात राहीच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. तिचा सराव बंद होता. अशा परिस्थितीतही राहीने दिल्लीतील विश्वचषक स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. त्यानंतर तिने आणखी एक पाऊल टाकले आहे. तिच्यातील जिद्द, जिंकण्याची उर्मी यातून अधोरेखित होतेच. शिवाय परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक असलेल्या मानसिक ताकदीचेही दर्शन घडते. राही खंबीर आहे. ती ऑलिम्पिक पदक नक्की जिंकेल, असा विश्वास तिच्या कुटुंबीयांना जेवढा वाटतो, तितका तो क्रीडाप्रेमींनाही वाटतो, हाच तिच्या कामगिरीचा विशेष म्हणावा लागेल. जगात भारताचे म्हणून आज वेगळे स्थान आहे. परंतु क्रीडा क्षेत्रात आपण मागे पडतो. क्रिकेटमध्ये आपले नाव असले, तरी सर्वाधिक देशांचा सहभाग असलेल्या ऑलिम्पिकमध्ये आजवर फारसा ठसा आपल्याला उमटवता आलेला नाही. दोन, चार पदकांशिवाय आपल्या हाती काही पडताना दिसत नाही. तरीदेखील मागच्या काही वर्षात आपली कामगिरी सुधारते आहे. कुस्ती, बॅडमिंटन, नेमबाजी, बॉक्सिंग अशा वेगवेगळय़ा खेळातून चांगले खेळाडू पुढे येत आहेत. त्यामुळे मागच्या काही वर्षात एक सकारात्मक वातावरण तयार झाल्याचे बघायला मिळते. याशिवाय क्रीडा सुविधांचा दर्जाही सुधारत आहे. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये आगामी काळात निश्चित पदके वाढू शकतील. तिरंदाजी, नेमबाजी हे प्रामुख्याने एकाग्रतेवर आधारलेले खेळ आहेत. लक्ष्य साधण्यासाठी किती कमालीची एकाग्रता लागते, हे आपण पुराणकथातूनही ऐकले आहे. स्वाभाविकच या खेळातील खेळाडूंना शांत व एकाग्रचित्ताने खेळ करावा लागेल. इतर क्रीडा प्रकारातील क्रीडापटूही गुणवानच आहेत. तेही आपले कौशल्य पणास लावतीलच. या सर्वांना शुभेच्छा. कोरोना अजून संपलेला नाही. निराशेचे वातावरणही अजून सरलेले नाही. मात्र, हे मळभ टोकियो ऑलिम्पिकमधील उच्चकोटीचा खेळ, त्याचा आनंद यातून दूर व्हावे, हीच सर्वांची अपेक्षा असेल.
Previous Articleमौजे आटपाट नगर
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.