उद्या रात्रीपासून लॉकडाऊन आणखी कडक
प्रतिनिधी/ सातारा
गेल्या दीड वर्षांपासून जिल्हय़ात कोरोना विरुध्दच्या लढाईत दुसऱया लाटेने जिल्हय़ाला राज्यात क्रमांक एकवर नेवून ठेवले आहे. मात्र, वाढती बाधित वाढ, वाढता मृत्यूदर यावर प्रशासनाकडून फक्त लॉकडाऊन कडक केला एवढीच भूमिका घेतली जात आहे. दुसरीकडे ना बाधित वाढ थांबली ना मृत्यूसत्र थांबेना. लॉकडाऊन वाढवून त्याचा इफेक्ट होणार आहे का? आता लोकांना निर्भय करुन त्यांच्यावर उपचाराची सुविधा निर्माण करणाऱया कोरेगावचे आमदार महेश शिंदे, पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्याकडून माहिती घेवून आता जिल्हय़ातील लोकप्रतिनिधींनी कोरोनाचा कहर कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा जिल्हावासिय व्यक्त करत आहेत.
दरम्यान, जिह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2083 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 35 बाधितांचा मृत्यू झाला आहे. रविवारी सायंकाळी 1,198 जणांना घरीए सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी दिलीय.
राज्यात साताऱयाची स्थिती चिंताजनक
राज्यभरात पुणे, मुंबई, नाशिकसारखी मोठय़ा संख्येंची कार्पोरेट शहरांमध्ये कोरोनाचा कहर कमी होवू लागलाय. मात्र, सातारा जिल्हय़ात दोन हजारांच्या संख्येने बाधित वाढ होतेय. गेली दोन दिवस यात थोडी गती कमी झाली होती. तर मृत्यूची संख्याही थोडी कमी येत असली तर बाधितांच्या मृत्यूची संख्या 30 वर स्थिर आहे. या स्थितीत पुन्हा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जाहीर केला आहे. आता पुढील सहा दिवसात कडक लॉकडाऊन पाळून किती दिलासा लाभेल याचे उत्तर 1 जूनला कळेल.
कोरोनाबाबत लोकांमध्ये गोंधळाची स्थिती
लॉकडाऊन गतवर्षी उपयुक्त ठरला. लोकांनीही भितीपोटी तो कडकपणे पाळला. मात्र, लॉकडाऊननंतर जे सामाजिक, आर्थिक परिणाम समोर आलेत ते भयानक आहेत. अनेकांचे रोजगार गेलेत, हाताला काम नसल्याने कष्टकऱयांच्या जगण्याचे प्रश्न निर्माण झालेत. बेरोजगारीमुळे युवकांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. डिसेंबर, जानेवारीत जो जिल्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत होता तोच जिल्हा ऐन कडक उन्हाळय़ात कोरोना संसर्गाच्या तडाख्यात सापडून पुरता पॅनिक झालेला आहे. त्यामुळे नेमके काय ? याचा लोकांच्या मनात गोंधळच आहे.
कोरोना वाढला की लोकांवर दोष
जिल्हय़ात गेल्या दीड महिन्यात हजारोंच्या संख्येने तपासण्या सुरु आहेत. त्यातून जे बाधित समोर येत आहेत त्यापैकी 20 टक्केच दवाखान्यात उपचारासाठी येतात बाकी 80 टक्के लक्षणे नसलेले बाधित होम आयसोलेट आहेत. ज्यांना काहीच सुविधा नाही ते कोरोना केअर सेंटरमध्ये थांबतात. मात्र, होम आयसोलेट रुग्ण नियम पाळत नसल्याने कोरोना वाढतोय असे सांगून प्रशासनाला जबाबदारी झटकता येणार नाही. कोरोना कमी झाला की प्रशासनाची कामगिरी अन वाढला की लोकांवर दोष असा प्रकार सुरु आहे.
निलेश लंके, पोपटराव पवारांचे मार्गदर्शन घ्या
कोरेगाव तालुक्यात आमदार महेश शिंदे त्यांनी सुरु केलेल्या कोरोना केअर सेंटरमध्ये अनेकांना धीर, दिलासा व उपचार देवून बरे करत आहेत. तर शिंदे यांचे काम पाहून पारनेरमध्ये आमदार निलेश लंके यांनी हजारोजणांना कोरोनामुक्त करण्यासाठी आरोग्य सुविधा पुरवल्या आहेत. तिथे जे सेंटर निर्माण केलेय त्यात कोरोना बाधित नाचत असल्याचे व्हिडिओ लोक पहात आहेत. दुसरीकडे हिवरेबाजारात सरपंच पोपटराव पवार यांनी विलगीकरण व उपचाराबाबत वेगळा पॅटर्न राबवून कोरोनाला आटोक्यात ठेवलेय. काळजी घ्या, नियम पाळा हे सातारकर करतच आहेत. असलेल्या, नसलेल्या कोरोनाच्या तावडीत सापडण्याची कोणालाही हौस नाही. म्हणूनच वाढती बाधित संख्या व वाढता मृत्यूदर रोखण्यासाठी थोडे त्यांचेही मार्गदर्शन घ्या, असे नागरिक म्हणू लागले आहेत.
म्यूकर मायकोसिस कसा रोखणार ?
बाधित रुग्णावर उपचार करण्यासाठी जे इंजेक्शनस वापरण्यात येतात. त्यापैकी रेमडिसीवरला तर जागतिक आरोग्य संघटनेने बंदी घातलीय मात्र तेच इंजेक्शन प्रशासनाकडून खास पथक निर्माण करुन नियमानुसार वितरीत केले जात आहे. मात्र, रेमडिसीवर, स्टिराईडच्या वापराच्या दुष्परिणामातून पुढे म्युकर मायकोसिस होत असल्याचे समोर येतेय तर मग या औषधांचा कोरोना बाधिताच्या उपचारात वापर करुच नका. पहिल्यांदा कोरोना अन आता नंतर म्युकर मायकोसिस या दोन्ही संकटांना हद्दपार करण्यासाठी लसीकरणाचा पर्याय चांगला असताना लसीकरण थांबले याची केंद्र व राज्य शासनाला लाज देखील वाटत नाही, अशी लोकभावना बोलू लागलीय.