काश्मीरमध्ये हिमवृष्टीमुळे अनेक मार्ग बंद
जम्मू-काश्मीरमध्ये हिवाळय़ाला प्रारंभ होताच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) भारतीय सैन्यासाठी आव्हाने वाढू लागतात. पाकिस्तानकडून होणाऱया इनफिल्टेशन बिड्स म्हणजेच शस्त्रसंधी उल्लंघनाच्या आडून दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून आणण्याचा प्रयत्न हे सर्वात मोठे आव्हान असते. परंतु भारतीय सैन्य यंदा सातत्याने वाढणाऱया घुसखोरीच्या प्रयत्नांना रोखण्यासाठी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्थेसह (मल्टी टियर सिक्युरिटी सेटअप) तयार आहे.
नोव्हेंबर 2003 मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सरकारांनी एलओसीवर युद्धविरामाचा करार केला होता. या करारानुसार दोन्ही देशांचे सैन्य परस्परांवर गोळीबार करणार नसल्याचे ठरले होते. 3 वर्षांपर्यंत म्हणजेच 2006 पर्यंत पाकिस्तानकडून या शस्त्रसंधीचे पालन करण्यात आले. परंतु त्यानंतर पाकिस्तानने सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. गोळीबाराच्या आडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक निर्माण करण्यात आलेल्या लाँचपॅड्सवरून घुसखोरीचे प्रयत्न झाले. तसेच पाकिस्तानी सैन्यानेही घुसखोरी घडवून आणण्यास मदत केली आहे.
शस्त्रसंधी उल्लंघनाप्रकरणी पाकिस्तानने 2020 मध्ये मागील 17 वर्षांमधील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. पाकिस्तानकडून गेल्या वर्षभरात 4,100 पेक्षा अधिक वेळा शस्त्रसंधीचा भंग करण्यात आला आहे. नोव्हेंबर महिन्यात 128 वेळा, तर ऑक्टोबरमध्ये 394 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. 2019 मध्ये 333 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले होते. 2015 मध्ये 405 वेळा आणि त्यापूर्वी 2014 मध्ये 583 वेळा शस्त्रसंधीचा पाकिस्तानकडून भंग करण्यात आला होता.
दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न
शस्त्रसंधी उल्लंघनाचा मुख्य उद्देश दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून आणणे हाच असतो. घुसखोरीचा प्रयत्न होऊ शकेल अशाच ठिकाणी पाकिस्तानी सैन्य गोळीबार करत असते. पाकिस्तानच्या रणनीतित अनेकदा काही बदल होत असतो. उदाहरणार्थ अन्य भागात शस्त्रसंधी भंग करून भारतीय सैन्याला गुंतवून दुसऱयाच ठिकाणाहून घुसखोरीचा प्रयत्न केला जातो. पाकिस्तानसोबत भारताची सीमा एकूण 3323 किलोमीटर लांबीची आहे. यात 221 किलोमीटर आंतरराष्ट्रीय सीमा आणि 740 किलोमीटर प्रत्यक्ष नियंत्रण रेषा सामील आहे.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरुन घुसखोरीचा प्रयत्न सर्वाधिक प्रमाणात होत असल्याचे जम्मू-काश्मीरमध्ये तैनात भारतीय सैन्याधिकाऱयांचे मानणे आहे. पर्वतीय भाग असल्याने दहशतवद्यांना छुपे मार्ग मिळतात आणि एलओसी उंच-सखल भागात असल्याने लपणे किंवा लपून बाहेर पडणे सोपे ठरते. परंतु भारतीय सैन्याने आता अनेक हाय सर्व्हिलान्स गॅझेट तसेच मल्टी टियर सिक्युरिटीद्वारे घुसखोरीला आळा घातला आहे. एखाद्या दहशतवाद्याने एलओसीतून घुसखोरी केल्यास तो एक तर पकडला किंवा मारला जातो.
पुंछ-राजौरी संवेदनशील
हिवाळय़ाचा ऋतू प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात सैन्यासाठी मोठे आव्हान असते. विशेषकरून जम्मूमध्ये घुसखोरीचे प्रयत्न वाढतात. काश्मीरच्या उरी आणि कुपवाडा भागांमध्ये एलओसीवर हिमवृष्टी झाल्याने अनेक खिंडी बंद होतात. परंतु जम्मूच्या पुंछ आणि राजौरीमध्ये हिवाळय़ाचा कालावधी सैन्यासाठी अत्यंत दक्ष राहण्याचा असतो. सैन्याच्या सूत्रांनुसार 250-300 दहशतवादी लाँचपॅड्सवर घुसखोरीसाठी तयार आहेत. हा आकडा वाढता किंवा कमी होत राहतो. परंतु गुप्तचरांच्या माहितीनुसार इतक्या संख्येत दहशतवाद्यांना राजौरी आणि पुंछ जिल्हय़ांच्या पार पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला लागून असलेल्या लाँचपॅड्सवर घुसखोरीसाठी तयार ठेवले जाते. संधी मिळताच घुसखोरी घडवून आणण्याची आगळीक केली जाते.
पाकिस्तानने बदलली घुसखोरीची पद्धत
भारतीय सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दक्षता वाढविलयावर पाकिस्ताननेही घुसखोरीच्या पद्धतींमध्ये बदल केले आहेत. ड्रोनद्वारे भागावर नजर ठेवली जाते, अनेकदा दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रांशिवाय पाठविण्याचा प्रयत्न होतो. ड्रोनने शस्त्र पाडविण्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. पुंछमध्ये कृष्णा खोरे आणि मेंढर यासारख्या भागांमध्ये हिमवृष्टी तुलनेत कमी होत असल्याने तेथून हिवाळय़ात घुसखोरीचा प्रयत्न अधिक होतो. सौजियां आणि पुंछला लक्ष्य करत पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येतो.
सैन्याची मल्टी टियर स्ट्रटजी
मागील दोन दशकांमध्ये भारतीय सैन्याला घुसखोरी रोखण्यास अत्यंत मोठे यश मिळाले आहे. तंत्रज्ञान आणि व्यूहनीतित बदल ही यामागील कारणे आहेत. सैन्याच्या अधिकृत सूत्रांनुसार सैन्य आता युएव्ही (अनमॅन्ड एरियन व्हीकल), सर्व्हिलान्स अँड टार्गेट (सारटा) इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आणि मॉडर्न शस्त्रास्त्रs तसेच अन्य सर्व्हिलान्स गॅझेटचा वापर करते. या अत्याधुनिक उपकरणे आणि यंत्रणेच्या मदतीने घुसखोरी रोखण्यास सैन्याला यश मिळाले आहे. यंदा पाककडून तीनवेळा घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला, तिन्हीवेळा कुठल्याही नुकसानीशिवाय सैन्य आणि सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना यमसदनी पाठविले आहे.
पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन आणि घुसखोरीच्या प्रयत्नांमध्ये वाढ झाली आहे. परंतु सैन्यही पूर्ण दक्ष असून प्रत्येक गोळीला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. परंतु पाकिस्तानही घुसखोरी घडवून आणण्यासाठी नवनवे मार्ग अवलंबत आहे, पण सैन्याकडे आता नवे तंत्रज्ञान असल्याचे संरक्षण मंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या घटना…
1 जुलै 2020 : सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडणाऱया एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा खात्मा केला.
9 ऑगस्ट 2020 : पुंछमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले, दोन दहशतवादी गंभीर जखमी झाले.
9 नोव्हेंबर 2020 : काश्मीरच्या माछिल सेक्टरमध्ये 3 दहशतवाद्यांना घुसखोरीनंतर त्वरित ठार करण्यात आले.
एलओसीनजीकच्या गावांवर प्रभाव
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला लागून असलेल्या गावांमध्ये पाकिस्तानच्या शस्त्रसंधी उल्लंघनांचा थेट प्रभाव पडतो. लोक दहशतीत राहतात, परंतु आता पाकिस्तानला दहशतवाद्यांच्या घुसखोरीकरता स्थानिक लोकांची मदत मिळत नाही. उलटपक्षी स्थानिक लोक आता सैन्याची मदत करत आहेत. अनेकदा घुसखोरीचा प्रयत्न स्थानिक लोकांच्या मदतीने हाणून पाडण्यात आला आहे.
पाकिस्तानकडून यंदा सर्वाधिक शस्त्रसंधी भंग
2020 4,100
2019 3,233
2018 3,000
2017 1,300
2016 449
2015 405
2014 583
2013 347
2012 114
2011 62
2010 44
ऑपरेशनली सर्वात सक्रीय चौकी
पुंछ सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर ऑपरेशनली सर्वात सक्रीय चौकी (पोस्ट) आहे. ऑपरेशनली ऍक्टिव्ह पोस्ट याचा अर्थ तेथे सातत्याने पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असते. पाकिस्तानी सैन्य शस्त्रसंधीचा भंग करून दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून आणण्याच्या प्रयत्नात असते.
उंची त्यांच्याकडे, निर्धार आमच्याकडे
या भागात शत्रूची चौकी अधिक उंचीवर आहे. भौगोलिक स्थितीमुळे शत्रू भले वर्चस्व गाजवू पाहत असला तरीही दृढनिश्चयी भारतीय सैन्याचाच तेथे वरचष्मा आहे. याचमुळे दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रयत्न सातत्याने हाणून पाडण्यात येत आहे. हिवाळय़ात हा भाग मोहिमेच्या दृष्टीकोनातून अधिक सक्रीय दिसून येतो. कारण अनेक फूट उंच बर्फ जमा झाल्याने काश्मीरमधून दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत नाहीत. या कालावधीत पीर पंजाल पर्वतरांगेच्या दक्षिण भागात हालचाली वाढतात. भारतीय सैन्य तेथे पूर्णपणे दक्ष असून शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून आहे.