उपराष्ट्रपती नायडूंची स्पष्टोक्ती, प्रचंड गदारोळ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राज्यसभेत गोंधळ घालून कामकाजात अडथळे आणणाऱया विरोधी पक्षांच्या 12 खासदारांचे निलंबन करण्याचा निर्णय मागे घेणार नाही, अशी स्पष्टोक्ती उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केली आहे. त्यांनी राज्यसभेचे अध्यक्ष या नात्याने ही कारवाई सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी केली होती.
हे निलंबन मागे घ्यावे असा आग्रह मंगळवारी विरोधी पक्षांनी धरला होता. त्यासाठी सभागृहात गदारोळ माजविण्यात आला. या खासदारांनी आपल्याकडे येऊन सदनाची क्षमायाचना केल्याशिवाय निलंबन रद्द होणार नाही, असे नायडू यांनी स्पष्ट केले. त्यानंतर सर्व विरोधी सदस्यांनी सभात्याग केला. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.
प्रश्नोत्तरांच्या तासानंतर सभागृहात विरोधी पक्षांनी निलंबनाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी सभाध्यक्ष नायडू यांनी खासदारांनी क्षमायाचना करावी अशी सूचना केली. मात्र, काँगेस नेते राहुल गांधी यांनी कशाची माफी असा उलट प्रश्न नंतर सभागृहाबाहेर ट्टिरवरुन केला. राहुल गांधी हे लोकसभेचे सदस्य आहेत. लोकसभेतही काँगेसने हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही खासदारांनी क्षमायाचना करावी, अशीच सूचना केली.
लोकसभेतही त्यानंतर गोंधळ झाल्याने कामकाजात अनेकदा व्यत्यय आला. त्यामुळे या सभागृहाचेही कामकाज दुपारनंतर दिवसभरासाठी स्थगित झाले.
पंतप्रधान मोदींची बैठक
मंगळवारी अधिवेशनाच्या दुसऱया दिवसाच्या कामकाजाचा प्रारंभ होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांनी बैठक बोलाविली होती. संसदेतील पक्षाच्या धोरणासंबंधी ही बैठकी होती असे नंतर स्पष्ट करण्यात आले. या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथसिंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर इत्यादी ज्येष्ठ मंत्री उपस्थित होते.