तरूण भारत व आमदार प्रकाश आवाडे यांचे मोलाचे योगदान, दीड महिन्यापासून अडकून पडले होते गोव्यात
प्रतिनिधी/इचलकरंजी
लग्नकार्यासाठी गोव्यात गेलेले इचलकरंजीचे १३ नागरिक लॉककडाऊनमुळे तब्बल दीड महिन्यापासून अडकून पडले होते. दोन वेळा लॉककडाऊन वाढल्यामुळे त्यांना इचलकरंजीत येण्यास अनेक अडचणी येत होत्या. दरम्यान त्यांनी गोवा येथील तरूण भारतच्या कार्यालयाशी संपर्क साधून घरी जाण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. त्यानुसार तरूण भारत व इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांच्या सहकार्यामुळे १० मे रोजी रात्री या नागरीकांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचवण्यात यश आले.
येथील एका परिवारातील १३ जण २० मार्चला गोवा येथे नातेवाईकांच्या लग्न समारंभाकरीता गेले होते. दरम्यान कोरोनाच्या पॉर्श्वभूमीवर २२ मार्च पासून संपूर्ण देशात लॉककडाऊन करण्यात आले. यामुळे त्यांना स्वगृही येता आले नाही. राज्य व जिल्हा बंदीमुळे त्यांना इचलकरंजीत येण्यास अडचणी येत होत्या. यावेळी गोवा येथील दैनिक तरूण भारतच्या कार्यालयाशी त्यांनी संपर्क साधून स्वगृही जाण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. शासनाने काही अटी व शर्थींवर राज्य व जिल्हा प्रवासासाठी परवानगी दिल्यामुळे त्यांनी गोवा सरकारकडे रितसर परवानगीसाठी अर्ज केला. यावेळी तरूण भारतने इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांच्याशी संपर्क साधला. त्यानुसार आमदार आवाडे यांनी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाची परवानगी मिळवली. गोवा राज्याने दोडामार्ग पर्यंतची त्यांना परवानगी दिली.
त्यानुसार १० मे रोजी दुपारी ते दोडामार्ग येथे पोहचले. या १३ जणांची तपासणी व कागदपत्र तपासणी प्रक्रिया पूर्ण होण्यास रात्र झाली. त्यानंतर रात्री उशीरा ते इचलकरंजीला पोहचले. यावेळी शहरातील तपासणी नाक्यावर त्यांची तपासणी करून त्यांना होम क्वारंन्टाईन करण्यात आले आहे. तब्बल दीड महिन्यानंतर घरी पोहचलेल्या या परिवाराने तरूण भारतचे आभार मानले आहेत.