जलस्रोत खात्यातील जाणकारांचे मत
प्रतिनिधी /फोंडा
खांडेपार व म्हादई नदीसह अन्य नद्यांना आलेला महापूर हा कुठल्याही धरणाचे पाणी सोडल्यामुळे आलेला नाही. पश्चिम घाटीत झालेल्या ढगफुटीचा हा परिणाम असल्याची शक्यता जलस्रोत खात्यातील काही जाणकारांनी व्यक्त केली आहे. ढगफुटीने झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रमुख नद्या व उपनद्यांमध्ये पाणी सामावून घेण्याची क्षमताच संपुष्टात आल्याने सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली व पुराचे पाणी अनेक गावांमध्ये घुसले.
सन 1982 नंतरचा दुसरा मोठा महापूर
यापूर्वी सन 1982 साली गोव्यात असाच महापूर आला होता. मात्र त्यावेळी नदीच्या काठापर्यंत एवढी लोकवस्ती वाढली नव्हती. शुक्रवारच्या महापुरात खांडेपार व दूधसागर नदीसह गांजे नदीने धोक्याची पातळी ओलांडून 6 ते 7 मीटर पर्यंत उंची गाठली होती. यापूर्वी कितीही पाऊस पडला तरी म्हादईची पातळी 10 रेडय़ूस लॅवलपर्यंत जायची. यावेळी ती तब्बल 13 रेडय़ूस लॅवलपर्यंत पोचली होती. खांडेपार नदीची पातळी 7 मीटरच्या वर गेली होती. एकाचवेळी खांडेपार, दूधसागर, म्हादई या मुख्य नद्यांसह त्यांना मिळणाऱया उण्णैय, रगाडा या नद्यांनाही गुरुवार व शुक्रवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी चढले. एखाद्या नदीत पाण्याची क्षमत वाढल्यास तिला लागून असलेली दुसरी नदी तिचे पाणी सामावून घेते. ढगफुटीनंतर एका वेगात खाली आलेला प्रचंड प्रवाह नद्यांचे पाणी सामावून घेण्याच्या क्षमते पलिकडे गेला व पातळी ओलांडून पुराचे पाणी आसपासच्या गावांमध्ये घुसले. शिवाय दुपारी समुद्राला भरती आल्याने वाघुर्मे व सावईवेरे येथे मांडवीला मिळणाऱया खांडेपार नदीच्या पाण्याला अटकाव झाला. गांजे येथून पुढे खाडीला मिळणाऱया म्हादईच्या प्रवाहातही असाच अडथळा निर्माण झाल्याने पुराचे पाणी गावात शिरले. नेमकी याच दिवशी पौर्णिमा असल्याने समुद्राच्या भरतीला अधिक वेग होता. त्यामुळे भरतीचे पाणी ओसरेपर्यंत खांडेपार, म्हादई व अन्य नद्यांचे पाणी दिवसभर तुंबून राहिले. रात्री उशिरा ओहोटीला सुरुवात झाल्यानंतर पुराचे पाणी ओसरले.
अरबी समुद्रातील तापमानवाढीचा परिणाम
गेल्या काही वर्षांमध्ये ढगफुटी वारंवार होत असून तापमानात होणारी वाढ व निसर्ग चक्रातील बदल ही त्यामागील मुख्य कारणे आहेत. गेल्या तीन चार वर्षांमध्ये अरबी समुद्रामध्ये पाण्याचे तापमान वाढल्याने वादळे येण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. यापूर्वी बंगालच्या उपसागरातच चक्रीवादळे यायची. निसर्गामध्ये होणाऱया या बदलांचा परिणाम महापूर व चक्रीवादळांसारख्या आपत्ती येण्यामागील मुख्य कारणे आहेत. अरबी समुद्रात निर्माण होणाऱया वादळांचा परिणाम पश्चिम घाटात दोन्ही बाजूंनी अतिवेगात येणारे ढग आदळून ढगफुटी झाल्यानेच डोंगर माथ्यावर गुरुवारी व शुक्रवारी पहाटेपर्यंत जोरदार पाऊस कोसळला होता. हे पाणी म्हादई व खांडेपार नदीत आले. शिवाय इतर उपनद्यामधून येणारे पाणी स्वीकारण्यास प्रमुख नद्यांमध्ये अटकाव झाल्याने पाण्याची पातळी वाढून त्याचे पर्यावसान म्हणून हा महापूर आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गोव्यातील नद्यांवर मॉनिटरिंग यंत्रणा उभारावी लागेल
महाराष्ट्रातील सांगली व चिपळूण भागात याच दरम्यान आलेल्या महापुरामागील मुख्य कारणे ढगफुटी व त्यानंतर पाण्याचा प्रचंड वाढलेला ओघ हेच होते. अरबी समुद्रात वाढणाऱया पाण्याच्या तापमानामुळे गेल्या काही वर्षांमध्ये मोठय़ाप्रमाणात वादळे येत आहेत. या वादळांमुळे पावसाच्या ढगांमध्ये होणाऱया वेगवान हालचालींची परिणती ढगफुटी व अतिवृष्टीमध्ये होऊ लागली आहे. नद्यांना यापुढेही असे पूर येण्याची शक्यता आहे. त्यासाठी हवामान खात्याप्रमाणेच नद्यांच्या पातळींमध्ये होणाऱया बदलांवर लक्ष ठेवण्यासाठी तंत्रविकसित यंत्रणा उभारावी लागणार आहे. त्याचे सातत्याने मॉनिटरिंग करावे लागेल. ज्यामुळे अशी आपत्ती येण्यापूर्वी नदी काठावर वसलेल्या गावांना सतर्क करता येईल. नदी किनाऱयाच्या जवळपास असलेली घरे व अन्य बांधकामांचे अतिक्रमण रोखण्यासाठी यापुढे कडक कायदे व त्यांची काटेकोर अंमलबजावणी झाल्यास महापुरातून होणारी बेसुमार हानी रोखता येईल. यापुढे अशा आपत्तीसंबंधी लोकांमध्ये जागृती व साक्षरता निर्माण करण्याची गरजही तज्ञ लोकांनी व्यक्त केली आहे.