कारवार जिल्हय़ात अतिवृष्टीमुळे दोन व्यक्ती दगावल्या : जिल्हा प्रशासनाच्या मदतीला एसडीआरडीएफ, एनडीआरएफची पथके : नौसेनाही मदतीला
प्रतिनिधी / कारवार
काळी नदीवरील कद्रा आणि कोडसळ्ळी धरणातील अतिरिक्त पाण्याच्या विसर्गामुळे आणि गंगावळी व अघनाशिनी या प्रमुख नद्यांना महापूर आल्यामुळे कारवार, अंकोला आणि कुमठा तालुक्यातील परिस्थिती अतिशय चिंताजनक बनून राहिली आहे. या तीन तालुक्यातील 79 खेडी जलमय झाली आहेत. 62 गंजी केंद्रे सुरू केली असून या केंद्रांमध्ये 4 हजार 307 नागरिकांना हलविण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे शुक्रवारी दोन व्यक्ती दगावल्या आहेत. यामध्ये होन्नावर आणि शिरसी तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.
अंकोला तालुक्यातील दोन व्यक्ती पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेल्या असून संबंधीत त्यांचा शोध घेत आहेत. संकसाळ येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या 11 व्यक्तींना हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या मदतीला एसडीआरडीएफ, एनडीआरएफची पथके, भारतीय तटरक्षक दल, भारतीय नौसेना धावून आली आहे. जिल्हय़ातील पूर परिस्थिती प्रभावीपणे हाताळण्यासाठी बेळगाव येथील एमएलआयआरसीच्या सैनिकांना पाठविण्याची विनंती जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. जिल्हय़ात पावसामुळे 66 घरे भागशः कोसळली आहेत. तर 9 घरे पूर्णपणे कोसळली आहेत. संततधार आणि मुसळधार पावसामुळे किती घरांमध्ये पाणी घुसले आहे. याचा हिशेब राहिलेला नाही.
जिल्हय़ात ठिकठिकाणी भूस्स्खलनाच्या घटना घडल्या आहेत. बेळगाव-कारवार दरम्यानच्या अनशी घाटात आणि अंकोला – हुबळी दरम्यानच्या अरेबैल घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. परिणामी बेळगाव-कारवार, हुबळी-अंकोला, शिरसी-कुमठा-कारवार आणि मंगळूर-कारवार दरम्यानची वाहतूक ठप्प झाली आहे. गंगावळी नदीला पाणी आल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. गंगावळी नदीने कधी नाही इतके रौद्ररुप धारण केले आहे. त्यामुळे डोंगरी, कल्लेश्वर, सुकसाळ, बेळसे, शिरूर ही गावे जलमय झाली आहेत.
कद्रा धरणातून 2 लाख 15 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग
कद्रा धरणाचे पाणलोट लाभलेल्या जोयडा, यल्लापूर, कारवार तालुक्याच्या पूर्व भागात तुफानी पाऊस कोसळत आहे. त्यामुळे धरणात 1 लाख 57 हजार क्युसेक्स इतके पाणी वाहून येत आहे. धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले असून या दरवाजातून आणि ऊर्जा निर्मितीनंतर दोन लाख 15 हजार 57 क्युसेक्स इतक्या पाण्याचा विसर्ग काळी नदीत होत आहे. सोडून दिलेल्या पाण्यामुळे कद्रा, यल्लापूर (कैगा प्रकल्प कॉलनी), उळगा, इरपागे, सिद्धर, किन्नर, बाळनी आदी कारवार तालुक्यातील खेडी जलमय झाली आहेत.
अतिरीक्त पाण्याचा धोका असलेल्या नागरिकांना घरगुती साहित्य आणि जनावरांसह सुरक्षितस्थळी हलविण्याचे कार्य युद्धपातळीवर हाती घेतले आहे. यासाठी कोस्टगार्ड, भारतीय नौसेना, पोलीस, होमगार्ड पोलीस, अग्निशमन दलाचे महसूल खात्याचे कर्मचारी झटत आहेत. पुराचा धोका असलेल्यांनी स्वेच्छेने सुरक्षितस्थळी निघून जावे, अन्यथा बळाचा
वापर करून पीडितांना सुरक्षितस्थळी हलविण्याचा इशारा जिल्हाधिकारी मलै मुगीलन यांनी दिला आहे.
हुबळीतील ते सहा युवक सापडले
हुबळी येथील नवनगरमधील 22 वर्षाखालील युवक अंकोला-यल्लापूर दरम्यानच्या शिर्ले धबधबा पहायला जाऊन गुरुवारी जंगलात बेपत्ता झाले होते. त्यांना शोधून काढण्यात पोलीस आणि वनअधिकाऱयांना यश आल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुखानी दिली. बेपत्ता झालेल्या त्या युवकांची नावे शरीफ कमबूलसाब दलाईत, अहमद सैय्यद शेख, अबताब सद्दाम शिरहट्टी, बाबूसाब मकबूलसाब शिरहट्टी, शानू बिजापूरी, इंतीयाज नीरसाब मल्लन्नावर अशी आहेत.