केएलईमध्ये ‘सिंड्रोम रॅपिड डायग्नोस्टीक टेस्ट ईन आयसीयू’वर व्याख्यान
प्रतिनिधी /बेळगाव
रोगनिदानासाठी पारंपरिक पद्धतींचा वापर करण्याऐवजी सुधारित व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यास त्वरित रोगनिदान करून संबंधितांवर उपचार करण्यास अनुकुल ठरते. त्यामुळे आयसीयूमधील मृत्यूचे प्रमाणही घटविता येते, असे डॉ. हरिष मल्लापूर यांनी सांगितले.
येथील केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळात व वैद्यकीय संशोधन केंद्रात बुधवारी ‘सिंड्रोम रॅपिड डायग्नोस्टीक टेस्ट ईन आयसीयू’ या विषयावर व्याख्यान देताना डॉ. हरिष यांनी वरील मत मांडले. हरिष हे बेंगळूर येथील नारायण हेल्थ विभागाचे आयसीयूचे तज्ञ आहेत.
एखादा रुग्ण आयसीयूमध्ये दाखल झाल्यानंतर त्याला दिसून येणाऱया लक्षणांवरून रोगनिदान करण्यालाही अवधी लागतो. पारंपरिक पद्धतीने रोगनिदानालाही विलंब होतो. त्यामुळे उपचाराला विलंब होऊन रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मृत्यूचे प्रमाण घटविण्यासाठी अत्याधुनिक बायोमार्कर पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
आयसीयूमध्ये त्वरित उपचाराबरोबरच त्वरित रोगनिदान करण्याचीही गरज असते. अत्याधुनिक रोगनिदान पद्धतीमुळे रुग्णाचे नेमके त्रास काय आहेत? यावर उपचार करता येणार आहेत. सिंड्रोमिक तपासणीत त्वरित निदान होते, असे डॉ. हरिष यांनी सांगितले.
यावेळी वैद्यकीय संचालक डॉ. एम. व्ही. जाली, जवाहरलाल नेहरु वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. एन. एस. महांतशेट्टी, डॉ. प्रिती मास्ते, डॉ. जी. एस. गावडे, डॉ. बसवराज बिज्जरगी, डॉ. राजशेखर सोमनट्टी, डॉ. अनिल मल्लेशाप्पा, डॉ. राजेश्वरी, डॉ. संतोष पाटील, डॉ. एम. एस. करिशेट्टी, डॉ. जयप्रकाश आप्पाजीगोळ आदी उपस्थित होते.