एक्साईजवरील हल्ल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून आदेश
मयुर चराटकर / बांदा:
मंगळवारी रात्री एक्साईज अधिकाऱयांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर संताप व्यक्त होत आहे. अवैध दारू वाहतूकदारांकडूनच हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. या अवैध वाहतूकदारांना कायमस्वरुपी चाप लावण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. त्यानुसार वरिष्ठ पातळीवरून मोठय़ा प्रमाणात हालचाली झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यातून महाराष्ट्रात बेकायदा वाहतूक करणाऱयांवर कडक कारवाईचा निर्णय घेण्यात आला. तसे आदेश राज्य उत्पादन शुल्क व सिंधुदुर्ग पोलिसांना देण्यात आले असून ठिकठिकाणी सापळा रचण्यात आला आहे. त्यामुळे अवैध दारू वाहतूकदारांचे माफियाराज संपुष्टात येणार का, याचे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.
मंगळवारी रात्री गोव्यातून महाराष्ट्रात होणाऱया गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकीच्या वाहनांची रेकी करण्यासाठी गेलेल्या विशेष पथकातील एक्साईज अधिकारी व कर्मचारी यांच्यावर पेडणे-गोवा परिसरात हल्ला झाला. या हल्ल्यात दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यांच्या डोळय़ाला व हाताला गंभीर दुखापत झाली. तक्रारीनुसार दोघांना पेडणे पोलिसांनी ताब्यात घेतले. तर या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतिलाल उमाप यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पातळीवरून विभागीय आयुक्त व अधीक्षकांना गोव्यात जाण्याचे आदेश दिले. या अधिकाऱयांनी तेथील अधिकारी व जखमींची विचारपूस केली.
गुरुवारी विशेष पथकातील कर्मचारी पेडणे पोलीस ठाण्यात गेले होते. मारहाणीत जे वाहन फोडण्यात आले, त्याची आरटीओ तपासणी झाल्यानंतर त्यांना ते वाहन त्याच स्थितीत पुन्हा पेडणे पोलिसांनी ताब्यात दिले. जखमींना अधिक उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले. तर विशेष पथकाला मोहिमेतून कार्यमुक्त करण्यात आले. पथकातील सर्व कर्मचारी आपल्या कार्यालयाच्या ठिकाणी सायंकाळी रवाना झाला.
अवैध वाहतूकदारांविरोधात विशेष मोहीम
मंगळवारी झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येत असून राज्य उत्पादन शुल्क विभाग अलर्ट झाला आहे. तर वरिष्ठ पातळीवरून एक्साईज व सिंधुदुर्ग पोलिसांना संयुक्तरित्या कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार मोहीम सुरू झाली असून कोणत्याही परिस्थितीत दारू महाराष्ट्रात येणार नाही, याचे नियोजन करण्यात आले. यामुळे अवैध वाहतूक दारांचे कंबरडे मोडले आहे. मात्र, ही मोहीम नेमकी किती दिवस चालणार, हे येत्या काळातच समजणार आहे.
रस्ते बंद केले, पण..
अवैध दारू वाहतूकदारांचे रस्ते बंद केले तरी ते वेगवेगळय़ा क्लुप्त्या वापरणार असून तेरेखोल नदीतूनही दारू वाहतूक होऊ शकते. गतवर्षी कोरोनाच्या काळात सीमा भागात कडक सुरक्षा होती. तेव्हा तेरेखोलमार्गे दारू वाहतूक होत होती. त्यावर बांदा पोलिसांनी एकदा कारवाई केली होती.
माहिती असते, मग कारवाई का नाही?
दारू वाहतुकीवर कारवाई झाल्यानंतर पोलीस असो किंवा एक्साईज, यांचे संशयित किंवा त्याच्या मित्रपरिवारासोबत चांगले संबध असतात, हे दिसून येते. जर वाहतूक होताना रायगड, कोल्हापूर येथे कारवाई केली जाते, तर मग तशी कारवाई सिंधुदुर्गात का होत नाही, याचा तपास होणे गरजेचे आहे. सर्वसामान्यांच्या मते सगळय़ांची मिलीभगत असते. कारवाई म्हणजे केवळ टार्गेट असते.