प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर राज्य परिवहन मंडळातर्फे बस सेवा सुरू झाली आहे. मात्र बसची अपुरी संख्या ही प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे. काही ठिकाणी बसना प्रचंड गर्दी आहे तर काही बसना प्रवासीच नसल्याने मंडळाने त्या बसच्या फेऱया रद्द केल्या आहेत किंवा कमी केल्या आहेत. परंतु याबाबत नेमके चित्र स्पष्ट होत नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम आहे.
मध्यवर्ती बस स्थानकावरून शहर परिसरात दररोज विविध भागांना बस जातात. उपनगरांतील बसफेऱया आजही कमीच आहेत. मात्र शहापूर, वडगाव, अनगोळ आणि टिळकवाडी या भागात जाण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानक, चन्नम्मा सर्कल आणि धर्मवीर संभाजी चौक येथे प्रवासी प्रतीक्षेत उभे असतात. परंतु या सर्वच भागांच्या बस प्रवास फेऱया कमी झाल्या आहेत.
त्यातही अनगोळ आणि वडगावच्या बस किमान अर्धा ते एक तासांनी येतात. मात्र टिळकवाडीला जाण्यासाठी तास दोन तास प्रतीक्षा करूनही बस येत नाहीत. साधारण 5.30 नंतर तर एकही बस वेळेवर येत नाही. सध्या शाळा जरी बंद असल्या तरी सरकारी आणि खासगी कार्यालये सुरू आहेत. कार्यालयातून घरी पोहोचण्यासाठी नागरिक बस थांब्यावर दीर्घकाळ प्रतीक्षा करत थांबतात. परंतु बसचा पत्ता नसतो.
प्रवासी नसल्याने फेऱया कमी
प्रवासी नसल्याने परिवहन मंडळ नुकसानीत आहे. त्यामुळे फेऱया कमी केल्या आहेत, असे मंडळातर्फे सांगण्यात येते. तर बस वेळेवर आल्या तर प्रवासी त्याचा लाभ घेवू शकतील, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. लॉकडाऊननंतर कोणत्या बस कोणत्यावेळेला कोठून कोठे जातील याचे वेळापत्रक परिवहन आगाराने प्रसिद्ध करणे आवश्यक होते. परंतु परिवहन मंडळ तोटय़ात आहे असे सांगण्यापलिकडे हा तोटा भरून काढण्यासाठी किंवा प्रवासी संख्या वाढविण्यासाठी परिवहन मंडळ कोणतेच प्रयत्न करत नाही.
त्या तुलनेत वडापरिक्षा धावू लागल्या असून त्यांनी दर वाढविले आहेत. त्याबद्दल प्रवाशांमध्ये नाराजी आहे. मात्र बस नसल्याने त्यांना दामदुप्पट पैसे देऊन वडापचा आधार घेतल्या शिवाय पर्याय नाही, अशी परिस्थिती आहे. परिवहन मंडळाने साधारण सर्व बस थांब्यावरील प्रवाशांची संख्या आणि प्रतिसाद लक्षात घेऊन बसचे वेळापत्रक प्रसिद्ध करावे आणि बस नियमित धावतील यावर भर द्यावा. पूर्व कल्पना दिल्याशिवाय कोणत्याही बस फेऱया अचानक रद्द करू नये, अशी मागणी प्रवाशांतून व्यक्त होत आहे.