ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
भारताने पाकिस्तानवर मिसाईल डागल्याचा दावा पाक लष्कराकडून करण्यात आला आहे. भारताने डागलेले हे मिसाईल पाकच्या पंजाब प्रांतातील मियाँ चन्नू भागात बुधवारी क्रॅश झाले असून, तेथील नागरिकांच्या मालमत्तांचे मोठे नुकसान झाल्याचे पाक लष्कराने म्हटले आहे.
पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते मेजर जरनल बाबर इफ्तेखार यांनी गुरूवारी पाकिस्तानी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी 6.43 वाजता पाकिस्तान एअरफोर्सच्या एअर डिफेन्स ऑपरेशन सेंटरद्वारे भारतीय क्षेत्रामध्ये हाय-स्पीड फ्लाईंग ऑब्जेक्ट उडताना दिसून आला. हे फ्लाईंग ऑब्जेक्ट भारताकडून लाँच करण्यात आले होते. या ऑब्जेक्टने काही वेळातच पाकिस्तानच्या दिशेने कूच केली. तसेच पाकिस्तानी हवाई हद्दीचे उल्लंघन करत हे ऑब्जेक्ट पंजाबच्या खानेवाल जिल्ह्यातील मियाँ चन्नू भागात क्रॅश झाले. हे ऑब्जेक्ट म्हणजे मिसाईल असल्याचा दावा पाक लष्कराने केला आहे. पृष्ठभागावरुन डागण्यात आलेल्या या मिसाईल सदृश्य ऑब्जेक्टमुळे नागरिकांच्या मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे, असेही इफ्तेखार यांनी म्हटले आहे.