वृत्तसंस्था / बेंगळूर
ऑस्ट्रेलियाच्या दौऱयासाठी भारताच्या पुरूष क्रिकेट संघाच्या पूर्वतयारीकरिता बीसीसीआयने चोख आयोजन केले होते पण राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाचे भवितव्य अधांतरी असल्याचे मत ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार लिसा स्थळेकरने व्यक्त केले आहे. संयुक्त अरब अमिरातमध्ये तीन संघांमध्ये महिलांची आयपीएल क्रिकेट स्पर्धा खेळविली गेली. तत्पूर्वी म्हणजे 8 मार्च रोजी ऑस्ट्रेलियात झालेल्या आयसीसीच्या महिलांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताने उपविजेतेपद मिळविले होते. या स्पर्धेनंतर भारतीय महिला क्रिकेट संघ एकाही सामन्यात खेळू शकला नाही, असेही स्थळेकरने सांगितले.
भारतातील कोरोना परिस्थितीची मला चांगली माहिती आहे पण भारतीय महिला क्रिकेटपटूंना अधिक सामने खेळण्याची संधी मिळत नसल्याबद्दल चिंता वाटते, असेही ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार आणि प्रख्यात क्रिकेट समालोचक लिसा स्थळेकरने सांगितले. बीसीसीआयशी करारबद्ध झालेल्या भारतीय महिला क्रिकेटपटूंना पुढील सामने केव्हा होणार याची चिंता वाटत आहे. त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर विपरित परिणाम होत असून या महिला क्रिकेटपटू पिछाडीवर राहिल्या आहेत. भारतीय महिला क्रिकेटपटूमध्ये गुणवत्ता निश्चितच असल्याने भारतीय महिला क्रिकेट क्षेत्रातही त्या आपले वर्चस्व ठेवू शकतील, असा विश्वास लिसाने व्यक्त केला. एबीसीच्या महिला आणि क्रीडा या संदर्भात आयोजलेल्या कार्यक्रमामध्ये लिसाने आपले वरील मत व्यक्त केले आहे. हा कार्यक्रम ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र आणि व्यापार विभागातर्फे आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाकरिता ऑस्ट्रेलियातील निवडक क्रीडा पत्रकारांना निमंत्रित करण्यात आले होते.
भारतीय महिला क्रिकेटपटूंना तब्बल सात महिन्यानंतर दुबईत झालेल्या महिलांच्या आयपीएल स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली होती. महिला क्रिकेटच्या बाबतीत बीसीसीआय योग्य दिशेने वाटचाल करीत आहे. मात्र महिलांची आयपीएल आणि त्यासाठीचा सराव यांच्या नियोजनात ते संथ गतीने नियोजन होत आहे. या स्पर्धेत एकूण 8 सामने खेळविले गेले. या स्पर्धेतील सामन्यांमध्ये मोठी धावसंख्या रचली गेली नाही. महिलांची पुरेशी तयारी झाली नसल्याने महिला क्रिकेटचा प्रचार योग्य प्रकारे झाला नाही. तसेच महिला क्रिकेटपटूंना सरावासाठी झगडावे लागले होते. महिलांची आयपीएल क्रिकेट स्पर्धा भरविण्यासाठी योजना संथ गतीने होत असल्याचे स्पष्टीकरण लिसा स्थळेकरने दिले आहे.