प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोना विषाणू विरोधात जगभरात लढाई सुरू आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी करण्यात आली आहे. देश लॉक डाऊन असताना कोल्हापुरात मात्र विनाकारण वाहनासह फिरणाऱ्यांवर कोल्हापूरचे पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशाने वाहतूक नियंत्रण शाखेने वाहनधारकांवर कडक कारवाई सुरू केली आहे. त्याहीपुढे जाऊन गेल्या ३ दिवसांपासून वाहतूक नियंत्रण शाखेने सातशे वाहनांवर जप्तीची कारवाई केली आहे.
जगभरात कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रभाव वाढत आहे. यापासून देशवासियांचे संरक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉक डाऊनचे आदेश दिले आहेत. या आदेशा प्रमाणे संपूर्ण देशवासीय स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी घरामध्ये थांबून कोरोना विरोधात लढा देत आहेत. अशा या परिस्थितीत संपूर्ण राज्य तसेच जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आलेले आहेत. कोल्हापूर शहरामध्ये देखील कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी नागरिक घराघरात थांबून आहेत. संसर्ग होणार नाही यासाठी काळजी घेत आहेत.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न नागरिकांकडून सुरू आहे. पण काही नागरिक जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या नावाखाली संचारबंदी असतानादेखील शहरातून फिरत आहेत. त्याही पुढे जाऊन अनेक नागरिक वाहने घेऊन भाजीपाला खरेदीच्या नावाखाली घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातच राहावे यासाठी जिल्हा व पोलिस प्रशासनाने कारवाई केली.
यात शहराच्या विविध भागांमध्ये विनाकारण वाहनावरून फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या या कारवाईमध्ये आजपर्यंत सातशे वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयाच्या परिसरामध्ये, तसेच पोलीस मुख्यालयाच्या आवारात जप्त केलेली वाहने सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. राज्यातील संचारबंदी उठल्या नंतरच ही वाहने संबंधित वाहनधारकांना परत केली जाणार आहेत. त्यावेळी दंडात्मक कारवाई करून, प्रसंगी गुन्हे दाखल करून ही वाहने दिली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी आदेश दिले आहेत.