बेळगाव शाखेच्या अध्यक्षा डॉ. नीता देशपांडे यांची पत्रकार परिषदेत माहिती
प्रतिनिधी / बेळगाव
साहित्य आणि कला या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्कार भारती या राष्ट्रीय संस्थेची बेळगावमध्ये स्थापना झाली असून, बेळगाव शाखेतर्फे दि. 24 जानेवारी रोजी प्रजासत्ताक आणि मकर संक्रांतीचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती बेळगाव शाखेच्या अध्यक्षा डॉ. नीता देशपांडे यांनी दिली.
गुरुवारी सकाळी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, संस्कार भारतीची स्थापना 1954 मध्ये झाली. देशभरात संस्थेच्या 1200 शाखा आहेत. संगीत, नाटक, चित्रकला, काव्य, साहित्य व नृत्य या क्षेत्रात संस्था कार्य करते. बेळगाव शाखेतर्फे दि. 24 रोजी दुपारी 4.30 वा. शाखेने यापूर्वी घेतलेल्या देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेतील 10 विजेते स्पर्धक गीत सादर करतील. याच दरम्यान महिलांसाठी तिळगूळचे दागिने तयार करण्याची स्पर्धा होणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन बेळगाव विमानतळाचे संचालक व चित्रकार राजेशकुमार मौर्य यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शास्त्रीय गायक पं. राजप्रभू धोत्रे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. नीता कुलकर्णी दिग्दर्शित ‘मोल स्वातंत्र्याचे’ ही लघु नाटिका व आसावरी भोकरे दिग्दर्शित ‘अग्निशिखा’ हा कार्यक्रम होणार आहे. स्पर्धेनंतर लगेचच बक्षीस वितरण होणार आहे. सदर कार्यक्रम सर्वांना विनामूल्य खुला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
संस्कार भारतीतर्फे वर्षभरात महत्त्वाचे असे जन्माष्टमी, संक्रांत, गणराज्य दिन, राखी पौर्णिमा, स्वातंत्र्यदिन साजरे केले जातात. बेळगाव शाखेतर्फे दर महिन्याला एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचा विचार आहे, असे कार्यवाह वैभव गाडगीळ यांनी सांगितले.