ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना संकटात सर्वसामान्य कर्जदारांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आणखी 3 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे जून ते ऑगस्ट या तीन महिन्यात कर्जदारांना कर्जाचा हप्ता न भरण्याची मुभा मिळेल. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली आहे.
दास म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी कर्जदारांना कर्ज न भरण्यास मुभा असेल.कर्जाच्या हप्त्याचे ओझे वाढू नये, यासाठी ते भरण्याची मुभा तीन महिन्यांसाठी देण्यात आली होती. ती मुदत आता आणखी तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. ही मुदत ऑगस्टपर्यंत असणार आहे.
रेपो रेटमध्ये 40 बेसिक पॉईंट्सची कपात
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो रेटमध्ये 40 बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आली आहे. रेपो रेट 4.4 टक्क्यांवरुन 4 टक्क्यांवर आणला आहे. या कपातीमुळे कर्जावरील व्याज कमी होणार आहे.रिव्हर्स रेपो रेटमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्के कायम राहणार आहे. त्यामुळे महागाई दर नियंत्रणात राहण्यास मदत होईल. 2020-21 या आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी शून्याच्या खाली जाण्याचा अंदाजही दास यांनी व्यक्त केला.