श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलातील संघर्ष गुरुवारीही कायम होता. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम आणि पुलवामा येथे झालेल्या वेगवेगळय़ा दोन चकमकींमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. सदर दहशतवादी ‘लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेचे असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्याकडून मोठय़ा प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. तसेच गुरुवारी सायंकाळनंतर राजौरी जिल्हय़ातील सुंदरबनी सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत आणखी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. याचदरम्यान दोन जवानांना वीरमरण आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. दरम्यान, गेल्या 24 तासांत सुरक्षा दलाने सात दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.
गेल्या काही दिवसात काश्मीरमध्ये घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे. दहशतवाद्यांचे कारनामे वाढल्यामुळे सुरक्षा दलानेही व्यापक मोहीम हाती घेतली आहे. गेल्या आठवडाभरात चार-पाच ठिकाणी घुसखोरीच्या घटना घडल्या आहेत. या कारनाम्यांविरोधात गुरुवारीही सीआरपीएफ, लष्कर आणि पोलीस दलाने संयुक्तपणे ही मोहीम राबविल्याची माहिती सुरक्षा प्रवक्त्याकडून देण्यात आली.
दक्षिण काश्मीरमध्ये बुधवारी रात्री उशिरा दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक उडाली. या भागात दहशतवादी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तेव्हा सुरक्षा दलाने या संपूर्ण भागाला वेढा घातला आणि शोधमोहीम हाती घेतली. एका घरात लपलेल्या दहशतवाद्याने सुरक्षा दलावर गोळीबार केला. त्यानंतर सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले होते, परंतु दहशतवाद्यांनी गोळीबार सुरूच ठेवला. अखेर सुरक्षा दलानेही उत्तरादाखल गोळीबार सुरू केला आणि चकमक उडाली. रात्रभर या भागात गोळीबार सुरू होता. यापूर्वी हंदवाडामध्ये चकमक उडाली होती. या चकमकीत हिजबुलचा टॉप कमांडर मेहराजुद्दीन ठार झाला होता. गेल्या 24 तासात 7 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.