तरुण भारत संवाद प्रतिनिधी/वैराग
सततचा लॉकडाऊन, दुकान बंद, होते तेवढे जवळचे पैसे संपलेत. आता किराणा आणण्यासाठी सुद्धा जवळ पैसा नाही. जगणे असाहय होत असून प्रशासनाने निदान आत्महत्या करायची तरी परवानगी द्यावी! अशी वैरागच्या किशोर देशमुख या व्यापाऱ्याची भावनिक पोस्ट सध्या सोशल मिडीयावर फिरत असून वैरागमध्ये सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.
गेल्या महिन्याभरात वैराग शहरात कोरोना रुग्ण वाढल्याचे कारण सांगत स्थानिक प्रशासनाने बारा दिवस जनता कर्फ्यू लावला, तर पुढे जिल्हाधिकारी यांचे आदेशाने बार्शी सह वैरागमध्ये पुन्हा दहा दिवस संचारबंदी लावली गेली. एक ऑगस्ट रोजी संचारबंदी उठली, परंतू प्रतिबंधित क्षेत्राचे कारण पुढे करत गेल्या महिन्यापासून सतत वैरागची बाजारपेठ बंद ठेवून दुकानदारांबरोबरच सर्वसामान्यांना वेठीला धरले जात आहे. त्यामुळे व्यापारी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.
किरकोळ दुकाने, रोडवरील, जीवनावश्यक वस्तुंची दुकाने उघडण्यास काय हरकत? यासाठी वरीष्ठाना माहिती व पाठपुरावा स्थानिक प्रशासनाने करणे गरजेचे आहे. व्यापारी बँकेत ” गोल्ड लोन ” नव जूनं करण्यासाठी गेले होते. नव जुन एवढयासाठी केलं की ? व्याज भरायला सुद्धा पैसे नाहीत. असे भावनिक सांगतात. जर व्यापाऱ्याची अशी आर्थिक स्थिती असेल तर सततच्या संचारबंदीने सर्वसामाान्यांचे काय हाल होत असेल ? खरच हातावर पोट असणाऱ्याच काय ?.वैरागच्या गांधी चौकात उभा राहुन चारही बाजुचे फोटो घेतले. असता स्मशान शांतता किराणा, औषध दुकान उघडण्याची परवानगी असुनही रोडवर माणूस,गर्दी नाही . कारण किराणा आणण्यासाठी सुद्धा सामान्य माणसा जवळ पैसा नाही.
बार्शीहून थोडाफार किराणा आणायला गेले असता. एका मॉल मार्ट मध्ये दुपारी ३५३ नंबर होता. ७० % ग्राहक वैराग आणि भागातले होते. वैरागचा कारखाना बंद झाला. आता वैराग बाजारपेठेला “घरघर ” लागलीय. बार्शी -सोलापुर ज्या नियमांच्या आधारावर चालु आहे. त्याच नियमा नुसार वैराग बाजारपेठ चालु करावी .वैराग कर व्यापारी वर्गाने वेळीच सावध होणं गरजेच आहे. नाहीतर पुढच्या पिढीला गाव सोडुन जगायला बाहेर जाव लागेल .गाव बंद ठेवणे हा पर्याय नाही. अशा परिस्थितीत जी साधनसामुग्री हाताशी आहे . तिचा वापर करून गाव कारभार चालवणं गरजेचे आहे. स्वतःचा जीव तर सगळयांनाच प्यारा आहे. तेंव्हा ग्रामपंचायत , पोलीस, महसुल यांनी सकारात्मक दृष्टीने वैरागच्या बाजारपेठेकडे पहावे. जगण्यासाठी राहलं साहिलं सोनं मोडायच म्हणल तरी सराफ कट्टा बंद…. नेमक करायचं काय ? प्रशासनाने साथ द्यावी , मदत करावी…. नाहीतर महिना प्रत्येक दुकानदाराला पाच हजार आत्पकालीन मदत द्यावी.
बसुन खातील अशी परिस्थिती नाही, पुढच्याच महिन्यात काय करायच ? हा प्रश्न आहे.तोंडावर गणपती , लक्ष्मी सण आलेत …. दसरा दिवाळी . खुणावतेय ….. मरण दररोजच अनुभवत आहोत …. निदान जिवंत असेपर्यंत तरी ” जगण्याचा . ” आनंद घेऊ द्या…… आम्ही प्रशासनासोबतच आहोत …. पण दुकाने उघडी ठेवू दयावे. असे भावानिक आवाहन व्यापारी किशोर आनंदराव देशमुख यांनी सोशल मिडीयावर केले असून सध्या वैरागमध्ये सर्वत्र चर्चेचा विषय ठरत असून प्रशासनाने वैराग बाजारपेठ सुरु करण्याची मागणी सर्व स्तरातून जोर धरत आहे.