प्रतिनिधी/ बेळगाव
पहिले व दुसरे रेल्वेगेट नागरिकांसाठी डोकेदुखीचे ठरत आहे. दररोज रेल्वे बराचवेळ या परिसरात थांबत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. परंतु रेल्वे थांबलेली असताना दोन डब्यांच्या मधून येणे कितपत शहाणपणाचे आहे? केवळ विद्यार्थीच नाही तर त्यांचे पालकही हा धोकादायक प्रवास करीत असल्याचे शनिवारी सकाळी निदर्शनास आले. त्यामुळे एखाद्या निष्पापाचा जीव जाण्यापूर्वी या प्रकाराला आळा घालण्याची गरज आहे.
रेल्वेस्थानकाचे रिमोल्डिंगचे काम सुरू आहे. बेंगळूरहून येणारी मालवाहू रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर घेऊन जावी लागते. परंतु ट्रक चेंज करताना सिग्नल व्यवस्थेमध्ये समस्या आल्यास रेल्वे पहिल्या व दुसऱया रेल्वेगेटनजीक थांबत आहे. मागील 15 दिवसात तिसऱयांदा रेल्वे थांबली आहे. बऱयाचवेळा रेल्वे थांबत असल्याने रस्त्याच्या एका बाजूने दुसऱया बाजूला जाणाऱया नागरिकांना समस्या येत आहेत. त्यामुळे रेल्वे थांबलेली असतानाही मिळेल त्या जागेतून नागरिक दुसऱया बाजूला जाण्याचा प्रयत्न करीत आहेत.
रेल्वेने आपल्या कार्यपद्धतीत बदल करणे आवश्यक
शनिवारी अशीच एक मालवाहक रेल्वे दुसरे रेल्वेगेटनजीक थांबली. बराचवेळ रेल्वे पुढे जात नसल्याने शाळेचे विद्यार्थी दोन डब्यांच्या मध्ये असणाऱया जागेतून येताना दिसले. अचानक जर रेल्वे सुरू झाली असती तर मोठा अनर्थ घडला असता. त्यामुळे हे प्रकार थांबविणे गरजेचे आहे. तसेच रेल्वेनेही आपल्या कार्यपद्धतीत बदल करणे आवश्यक आहे.
रेल्वे अधिकाऱयांना सूचना
लेव्हल क्रॉसिंगसाठी रेल्वे थांबविणे बंद करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱयांना देण्यात आल्या आहेत. तरीदेखील रेल्वे गेटवर थांबली असेल तर कोणीही ओलांडून जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन हुबळी विभागीय व्यवस्थापक अरविंद मालखेडे यांनी केले आहे.