अप्पर आयुक्तांची शिक्षणाधिकाऱ्यांना ताकीद
प्रतिनिधी/ बेळगाव
कामचुकार शिक्षकांना आवर घालण्यात शिक्षणाधिकारी कमी पडत आहेत. त्यामुळे शाळेच्या वेळेमध्ये इतरत्र बाहेर फिरताना अधिकतर शिक्षक दिसून येतात. अशा शिक्षकांवर कारवाई केली जात नसल्याने शिक्षण विभागाच्या अप्पर आयुक्तांकडून जिल्हाशिक्षणाधिकाऱ्यांना ताकीद देण्यात आली आहे. त्यामुळे यापुढील काळात कामचुकार शिक्षकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
शाळेत वेळेवर उपस्थित न रहाणे, शैक्षणिक कामाच्या नावाखाली इतरत्र फिरणे अशा शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून होत होती. परंतु शिक्षणाधिकाऱ्यांकडून अशा शिक्षकांवर कोणतीच कारवाई केली जात नसल्याने त्यांचे फावले होते. याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होत होता. कामचुकार शिक्षकांवर कारवाईची मागणी वर्तमानपत्रातूनदेखील केली जात असताना शिक्षणाधिकारी मात्र कोणतीच हालचाल करीत नव्हते.
अखेर शिक्षण विभागाच्या अप्पर आयुक्त जयश्री शिंत्री यांनी बेळगावचे जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांच्यासह चार शिक्षणाधिकाऱ्यांना ताकीद दिली आहे. कामचुकार शिक्षक व सीआरपींवर कारवाई केल्यानंतरच ते वळणावर येणार आहेत. आधीच शाळांचा अवधी कमी असताना वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करणे कठीण होते. अशात शिक्षकच कामचुकारपणा करत असतील तर विद्यार्थ्यांचे भवितव्य काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काही शाळांमध्ये बायोमेट्रिक हजेरी लावली जात असली तरी इतर शाळांमध्ये ही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे शिक्षक उशिरा आले तरी त्यांची नोंद कुठेही होत नाही. तसेच प्रशिक्षण, संघटनेच्या कामाच्या नावाखाली शाळा सोडून इतरत्र फिरणाऱ्या कामचुकार शिक्षकांवर यापुढे शिक्षण विभागाची नजर असणार आहे.