बेळगाव / प्रतिनिधी : बागलकोट – कुडची रेल्वे मार्गासाठी रामदुर्ग तालुक्यातील कमकेरी गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी देण्यात आल्या आहेत. सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र अद्याप नुकसान भरपाई दिली गेली नाही, तेव्हा तातडीने नुकसान भरपाई द्यावी, यासाठी कमकेरी गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
बागलकोट जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रति एकर 19 लाख रुपये देण्यात आले आहेत. मात्र रामदुर्ग तालुक्यातील शेतकऱ्यांना केवळ आठ लाख वीस हजार रुपये देण्यात येत आहेत. यामुळे आमच्यावर अन्याय होत असून इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाई प्रमाणे आम्हालाही नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी कृष्णा आरकेरी, विठ्ठल मेटगुड, हनुमंत गौडा, रमेश मुडमल, सुभाष आडकेरी, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.