सहा महिन्यात 25 मूक जनावरांचा बळी : पर्यावरणासाठी घातक असलेल्या प्लास्टिकचा वापर सुरुच
प्लास्टिक संकलन करुन रिसायकलिंगची गरज
बाळासाहेब उबाळे/कोल्हापूर
शासनाने कितीही प्लास्टिक बंदी केली असली तरी त्याला पूर्ण यश आलेले नाही. प्लास्टिकचा वापर माणसाकडून होतो. मात्र जीव मुक्या प्राण्यांचा जातो. प्लास्टिक पिशवीतून टाकलेले अन्न खाताना प्लास्टिकही पोटात जावून गेल्या सहा महिन्यात फक्त पांजरपोळ संस्थेत दाखल झालेल्या 25 मुक्या प्राण्यांचा बळी गेला आहे. मूक जनावरांच्या जिवावर बेतणाऱया प्लास्टिकचा वापर थांबवण्यासाठी नागरिकांनीच अंतर्मुख होण्याची गरज आहे.
कोल्हापूर शहरात फिरणाऱया भटक्या जनावरांची संख्या मोठी आहे. कोंडाळयात, रस्त्याकडेला टाकलेले अन्न, भाजी मार्केट येथील राहिलेला भाजीपाला ही जनावरे खातात. यातील बहुतांश अन्न तसेच भाजीपाला प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये असतो. जनावरांना चव कळत नसल्याने अन्नासह प्लास्टिक सुध्दा त्यांच्या पोटात जाते. अशा प्रकारे मोठय़ा प्रमाणात भटक्या जनावरांच्या पोटात प्लास्टिक जाते. प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने जनावरांचे पोट फुगायला लागते. काही दिवसांनी पोटात अन्नही जात नाही. यामुळे अशा जनावरांना अशक्तपणा येऊन ती रस्त्यातच आडवी होतात. बऱयाचवेळा कोंडाळयात टाकलेले अन्न आणि कचरा यामध्ये खिळे तसेच पत्रा असतो. अन्नातून पत्रा, खिळा पोटात गेल्यास जनावरांना इजा होऊन ती दगावतात.
महापालिकेला अशा जनावरांची माहिती मिळाल्यावर महापालिकेचे कर्मचारी त्या जनावरांना पांजरपोळ संस्थेत दाखल करतात. त्यावेळी चिकित्सा केल्यानंतर त्यांच्या पोटात प्लास्टिक असल्याचे निदान होते. पण ते काढता येत नसल्याने काही दिवसात अशा जनावरांचा मृत्यू होतो. गेल्या सहा महिन्यात पांजरपोळ संस्थेत दाखल झालेल्या अशा 25 मुक्या प्राण्यांचा बळी गेला आहे. यामध्ये गायींची संख्या अधिक आहे. प्लास्टिकमुळे मुक्या जनावरांचे जाणारे बळी थांबवायचे असतील तर नागरिकांनी अंतर्मुख होऊन प्लास्टिक जनावरांच्या पोटात जाणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे.
महिन्याला दोन ते तीन जनावरे पांजरपोळमध्ये –
शहरात फिरणाऱया भटक्या जनावरांच्या पोटात अन्नाबरोबर प्लास्टिक मोठय़ा प्रमाणात जाते. एका जनावराच्या पोटात सुमारे शंभर किलोपेक्षा अधिक प्लास्टिक आढळले आहे. या प्लास्टिकमुळे भटक्या जनावरांचा मृत्यू होतो. महिन्याला अशी दोन ते तीन जनावरे पांजरपोळमध्ये दाखल होतात. नागरिकांनी प्लास्टिकच्या वापराबाबत विचार केला पाहिजे. – डॉ.राजकुमार बागल, पांजरपोळ संस्था
पाळीव जनावरेही सोडली जातात-
भटक्या जनावरांना कोणी मालक नसतो. यामुळे ती सर्वत्र फिरुन नागरिकांनी टाकलेले अन्न खातात. पण अनेकजण पाळीव जनावरेही मोकळी सोडतात. पाळीव जनावरे सुध्दा प्लास्टिकसह हे अन्न खातात. तसेच ही जनावरे रस्त्यात ठाण मांडतात. यामुळे वाहतूकीलाही अडथळा होतो.
प्लास्टिक बंदी नावालाच-
वर्षातून काही दिवस प्लास्टिकच्या दुष्परिणामांची मोठी चर्चा होते. आपली जबाबदारी म्हणून संबंधित संस्था प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई करतात. काही दिवसांनी कारवाई थंडावते आणि पुन्हा प्लास्टिकचा वापर सुरु होतो. यामुळे भटक्या जनावरांसह पर्यावरणावर त्याचे परिणाम होत राहतात.