ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा दणदणीत पराभव केला. कसब्याच्या निवडणुकीत जे झालं, तेच नागपूरच्या दक्षिण पश्चिम म्हणजेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात होईल, असा दावा काँग्रेसचे नेते आशिष देशमुख केला आहे.
कसब्यातील भाजपच्या पराभवानंतर देशमुख यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. देशमुख म्हणाले, कसबा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना काँगेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी 10950 मतांनी पराभवाची धूळ चारली. काँग्रेसने 28 वर्षानंतर भाजपच्या गडाला सुरूंग लावला आहे. कसबा आणि दक्षिण पश्चिमच नागपूर या दोन्ही मतदारसंघाची राजकीय, भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती सारखीच आहे. दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये महाविकास आघाडीची एकी असल्यास देवेंद्र फडणवीस यांचा पराभव शक्य आहे.
ज्या पद्धतीने नागपुरात शिक्षक मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघ आणि इतर निवडणुकांमध्ये काँग्रेसचा महविकास आघाडीचा विजय होत आहे. त्याच ताकदीने एकत्रितपणे लढल्यावर पुढील निवडणुकीत नागपूरच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघातही महाविकास आघाडीचा विजय निश्चित होईल.