32 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, कोयना- कृष्णा नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ
प्रतिनिधी/ नवारस्ता
कोयना पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असलेल्या पावसामुळे कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढू लागली आहे. परिणामी धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी शनिवारी 20 रोजी सकाळी 10 वाजता कोयना धरणाचे वक्र दरवाजे साडेचार फूट उघडून 29 हजार 900 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, धरण पायथा विद्युतगृहामधून सुरू असलेला 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग आणि धरणाच्या सहा वक्र दरवाजांमधून सुरू असणारा 29 हजार 900 क्युसेक असा मिळून कोयना नदीपात्रात एकूण 32 हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढतच असल्यामुळे पाणलोट क्षेत्रातून येणारी पाण्याची आवक आणि सुरू असलेल्या विसर्ग यामध्ये तफावत पडत आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे पुन्हा वाढविण्याचा निर्णय कोयना सिंचन विभागाने शनिवारी घेतला. परिणामी तीन फूट उचललेले धरणाचे सहा वक्र दरवाजे शनिवारी सकाळी 10 वाजता साडेचार फूट उचलून धरणातून 32 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.
दरम्यान, कोयना नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असल्याने नदीवरील कोयना नदीवरील संगमनगर धक्का जुना पूल, निसरे साकव पूल पाण्याखाली गेले आहेत. पावसाचा जोर वाढल्यास मुळगाव पुलालाही पाणी घासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गेल्या चोवीस तासांत कोयनानगर येथे 23 (3749), नवजा 41 (4450) व महाबळेश्वर येथे 27 (4876) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात सध्या पाणीसाठा 97.18 टीएमसी असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ 8 टीएमसी पाण्याची गरज आहे.