दक्षिणेतील सुपरस्टार महेशबाबूचे विधान
हिंदी चित्रपटसृष्टी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतमधील भाषा वादादरम्यान आता महेश बाबूने बॉलिवूडसंबंधी मोठे वक्तव्य केले आहे. बॉलिवूडला मी परवडणारा नाही, याचमुळे मी हिंदी चित्रपटांमध्ये काम करून स्वतःचा वेळ वाया घालवू इच्छित नसल्याचे त्याने म्हटले आहे.
मला ऑफर्स मिळाल्या नाहीत असे नाही. परंतु त्यांना मी परवडणार नसल्याचे वाटते. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत मला मोठा मान-सन्मान मिळाला आहे. याचमुळे मी कधीच ही चित्रपटसृष्टी सोडून अन्य चित्रपटसृष्टीत काम करण्याचा विचार करू शकत नाही. चित्रपटनिर्मितीला अधिक विस्तार करण्याबद्दल मी विचार करत असतो. माझी स्वप्ने आता पूर्ण होत असल्याचे महेशबाबूने म्हटले आहे.
पॅन इंडिया स्टार म्हणून स्वतःला सादर करण्याचा माझा उद्देश नाही. दक्षिणेतील चित्रपटांना देशभरात यशस्वी करण्याचा माझा प्रयत्न आहे. तेलगू चित्रपट देशभरातील लोकांनी पहावेत अशी माझी इच्छा राहिली आहे. तेलगू चित्रपट हेच माझे बळ राहिले असल्याचे त्याचे म्हणणे आहे.
महेशबाबू लवकरच सरकारु वारी पेटला या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचे दिग्दर्शन एस. परशुराम पेटला यांनी केले आहे. त्यानंतर एस.एस. राजामौली यांच्या आगामी चित्रपटात तो काम करणार आहे.
55 कोटी रुपये मानधन
महेशबाबूने चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून पाऊल ठेवले होते. त्याचा पहिला चित्रपट 1983 मध्ये प्रदर्शित झाला होता. महेशबाबू एका चित्रपटासाठी 55 कोटी रुपयांचे मानधन आकारत आहे. तसेच त्याला जाहिरातींद्वारे देखील मोठी कमाई प्राप्त होत आहे.