-सर्वपक्षीय राज्यकर्त्यांच्या घोषणा फक्त कागदावच.
-सुशोभीकरण सोबतीला जलसंवर्धन महत्वाचे.
-रंकाळा दुरवस्था फोटो शशिकांत मोरे देत आहेत.
Kolhapur Rankala Lake : दर दोन वर्षातून रंकाळ्याच्या पाण्याला येणारी दुर्गंधी,संरक्षक कठड्यांची पडझड, बगीच्यासह पायाभूत सुविधांकडे कानाडोळा,सभोवताली पार्किंगसह वाहतूक व्यवस्थेचा उडालेला फज्जा,नैसर्गिक पुनर्भरणाचे बंद झालेले दरवाजे आदी समस्यांच्या गर्तेत शहरातील ऐतिहासिक सौंदर्य असलेला रंकाळा सापडला आहे. सर्वपक्षीय राज्यकर्त्यांच्या घोषणा फक्त कागदावच राहिल्याने रंकाळा तलाव मरणकळा भोगत आहे. रंकाळा सुशोभिकरणासह जलसंवर्धनासाठी ठोस तरतुदीसह प्रामाणिक प्रयत्न झाले तरच रंकाळयाला पुनर्वैभव प्राप्त होईल.
राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 125 कोटी रुपयांचा निधी मिळल्यावर रंकाळ्यासह आपली चांदी होईल,या महापालिकेतील झारीतील शुक्राचार्यांच्या अपेक्षेवर हरित लवादाने पाणी फेरले.रंकाळ्यासाठी हा 125 कोटींचा निधीही कमी पडेल,असे म्हणणारी यंत्रणा हरित लवादाच्या दणक्याने मिळाला तेवढा निधी बस्स झाला असे म्हणू लागली.लवादाच्या निर्णयानंतर केंद्र व राज्याकडून थेट रंकाळा संवर्धनासाठी निधी मिळण्याची दारे बंद झाली.मात्र रंकाळा परिसर सुशोभिकरणासाठी कोटय़वधींच्या निधींच्या घोषणा झाल्या.निधी खर्चाचा दावाही होतोय.मात्र त्याचे दृश्य परिणाम ठोसपणे समोर आले नाहीत.
केंद्र शासनाकडून रंकाळ्यासाठी पहिल्या टप्प्यात 8.66 कोटी रुपयांचा निधी आला.यामध्ये महापालिकेने अडीच कोटी रुपयांची भर घालत प्रदूषणमुक्तीसाठी प्रयत्न केले.मात्र,प्रत्यक्षात रंकाळ्याचे दुखणे कायम राहिले आहे.कोसळणाऱ्या संरक्षक भिंती व नैसर्गिक जलपुनर्भरण क्षमता खालावल्याने प्रदूषणमुक्त रंकाळा हे स्वप्नच राहिले.यातच पहिल्या टप्प्यातील निधीचा उपयोगिता सिद्ध करणे लांबच;उलट त्याचा हिशेबही प्रशासन सादर करू शकले नाही.साडेचार कोटी रुपये खर्चून तांबट कमान ते रंकाळा टॉवरपर्यंत टाकलेल्या पाईपलाईनमधून 60 टक्केच पाणी वहन होत असल्याचा अनुभव आहे.निसर्ग केंद्र प्राथमिक अवस्थेत आहे. गाळ काढण्यासाठीही प्रभावी यंत्रणा राबविली गेली नाही.दहा कोटी रुपयांपर्यंतचा निधी खर्च करूनही रंकाळ्याच्या मूळ दुखण्यात तसूभरही फरक पडला नसल्याचे हरित लवादासमोर स्पष्ट झाले होते.आता पुन्हा कोटय़वधी निधी खर्च करण्याचा घाट घातला जात आहे.यातून रंकाळा संवर्धन होईल ही आशा फोल ठरण्याची शक्यता सद्यस्थिती दर्शवते.
गाळ काढणे,ड्रेनेज लाईन टाकणे,सांडपाणी शुद्धीकरण केंद्र उभारणे,संरक्षक कठडे बांधणे,निर्गत पाण्याच्या व्हॉल्वची दुरुस्ती करणे,अत्याधुनिक लेसर शो व ऍम्पी थिअटरची उभारणी करणे आदी कामे दहा वर्षापासून प्रस्तावित आहेत.येथील जलसंवर्धनासाठीची राजकीय अनास्थेमुळे प्रयत्न होताना दिसत नाहीत. रंकाळा सुशोभिकरण करण्यात लोकप्रतिनिधींना का रस आहे हेही उघड गुपित आहे.परिणामी स्वच्छ सुंदर रंकाळ्याचे रंगविलेले चित्र आता कागदावरच राहण्याची शक्यता आहे.आता पुन्हा रंकाळ्यासाठी कोटय़वधी रुपयांच्या निधीची घोषणा होत आहेत.
हेही वाचा- दाट वृक्षांच्या सावलीत आजही इतिहासाची साक्ष देतेय कोल्हापुरातील ‘ही’ वास्तू
रंकाळा भोवतालचा परिसर म्हणजे वाहतुकीची कोंडी,प्रचंड गर्दी आणि गोंगाट हे चित्र कायम आहे.रंकाळा हे शहराचे ऐतिहासिक वैभव म्हणून टिकवण्यात आणि वाढवण्यास सर्वच बाजूने लोकप्रतिनिधी कमी पडल्याचे वास्तव आहे.राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर रंकाळ्याबात असलेली अनास्था पाहता येत्या काळात ठोस उपायोजना करीत रंकाळ संवर्धन न केल्यास रंकाळ्याच्या दुखण्यात भरच पडण्याची शक्यता आहे.
अपेक्षा ठरली फोल
रंकाळ्याच्या संपूर्ण संवर्धनासाठी ठोस उपायांची गरज आहे. दर दोन वर्षांनी डोके वर काढणाऱया जलपर्णी,जंतुसंसर्ग,पाण्याचा रंग बदलणे,दुर्गधी आदी व्याधींतून रंकाळ्याची मुक्तता कशी होणार? मूळ दुखणे सोडून इतरत्र खर्च केल्यानेच नियोजनशून्य कारभाराचा फटका रंकाळ्याला बसत आहे.पहिल्या टप्प्यातील निधीचा सदुपयोग केला असता,तर राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेतून हजारो कोटी निधी सहज उपलब्ध झाला असता.रंकाळ्यास पूनर्वैभव प्राप्तीसाठी राजकीय मुत्सद्दीपणा दाखविण्याची गरज असली तरी तत्पूर्वी,स्वनिधीतून महापालिकेने किमान प्रामाणिक सुरुवात होणे गरजेचे होते.आर्थिक बाजू कुमकुवत असल्याने महापालिका प्रशासनावर मर्यादा आहेत.दरम्यान,रंकाळा संवर्धनासाठी तत्कालीन केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी निधीची घोषणा केली ती घोषणाही हवेतच विरली.रंकाळ्यासाठी निधीची मागणी करताना बगीचा,लहान मुलांची खेळणी,विद्युत रोषणाई आदीबाबींचा समावेश केला जातो.निधी उपलब्ध झाल्यानंतरही या गोष्टी केल्याने रंकाळा कसा शुध्द होणार हे मात्र कोडेच आहे.
धास्तीमुळेच हात आखडता
रंकाळ्यासाठी आलेला निधीचे पर्यावरणीय निकषावर ऑडीट करण्याचे निर्देष हरित लवादाने दिले होते. त्यामुळे रंकाळ्यासाठी आलेल्या निधीचा खर्च व प्रस्तावित खर्चाचे लेखापरिक्षण झाले. रंकाळ्यासाठी आलेला निधीची पर्यावरणीय उपयोगिता झाली नसल्याचा ठपका ऑडिटमध्ये ठेवण्यात आला होता. मागील चुका टाळत संपूर्ण रंकाळा परिसर आणि त्यातील पाणीसाठा, नैसर्गिक समृद्धता नजरेसमोर ठेवून निधीची उपलब्धता करुन तो प्रामाणिकपणे खर्च करण्याची गरज आहे.