बंडाचा परिणाम जिल्हय़ातील दोन लोकसभा आणि पाच विधानसभा मतदारसंघांत नव्या-जुन्यांना संधी
खासदार प्रा.संजय मंडलिक, धैर्यशील माने शिंदे गटात
कोल्हापूर/संतोष पाटील
शिवसेनेत बंडाचा झेंडा हाती घेतलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्यासाठी जिह्यातही स्पर्धा लागल्याचे चित्र आहे. शिवसेनेच्या दोन्ही खासदारांची संदिग्ध भूमिका आहे. प्रकाश आबिटकर आणि राजेश क्षीरसागर हे आजी-माजी आमदार शिंदे गटात आहेत. आणखी सेनेचे दोन माजी आमदार काठावर आहेत. तर उर्वरित दोघे ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत. शिवसेनेतील बंडाळीनंतर जिह्यात मोठी पॉलिटिकल स्पेस निर्माण होणार असल्याने त्यादृष्टीने मोर्चेबांधणीला वेग आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाकेला ओ देत, सर्वात प्रथम माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार प्रकाश आबिटकर आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी जिह्यातून सर्वात प्रथम जाहीर पाठींबा दिला. खासदार प्रा. संजय मंडलिक आणि खासदार धैर्यशील माने हे दोघेही शिंदे गटात सहभागी झाल्यासारखे आहे. माजी आमदार चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, सत्यजित पाटील-सरूडकर तालुक्यातील घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ, करवीर, राधानगरी भुदरगड, पन्हाळा-शाहूवाडी, कोल्हापूर शहर उत्तर, शिरोळ आणि हातकणंगले या विधानसभा मतदारसंघांतील राजकारण लक्षवेधी ठरणार आहे.
शिंदे गटात सामील झालेले आणि होऊ शकणाऱयांसह भाजपकडे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार अमल महाडिक आणि सुरेश हाळवणकर अशी मोठी फौज तयार आहे. शिंदे गटाचे शिलेदार आणि भाजपची तगडी फौज विरुध्द उध्दव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी राजकीय धुळवड पहायला मिळणार आहे.
राज्यातील सत्तापरिवर्तनाचे सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर खासदार प्रा. संजय मंडलिक यांना केंद्रात राज्यमंत्री पद दिले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भविष्यात मंडलिक हेच भाजपचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार असतील. धनंजय महाडिक राज्यसभेत खासदार झाल्याने भाजपच्या साथीने संसदीय वाट भक्कम होईल, असा कयास मंडलिक गटाचा असू शकतो. मंडलिक यांनी बंड पुकारल्यास त्यांच्याविरोधातील उमेदवार कोण? याची चर्चा आतापासून रंगली आहे. मंडलिक यांच्या ‘यु टर्न’मुळे कागल, भुदरगड-राधानगरी विधानसभा मतदारसंघांतील राजकीय गणितांवर परिणाम होणार आहे. आमदार आबिटकर आणि समरजितसिंह घाटगे यांचे बळ वाढवणारा प्रा. मंडलिक यांचा हा निर्णय ठरु शकतो. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात धैर्यशील माने विरुध्द राजू शेट्टी अशीच लढत होईल. वाळवा आणि शिराळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कोणाच्या मागे तोच लोकसभेचा गुलाल उधळणार, अशी सद्यस्थितीतील राजकीय आखाडे सांगत आहेत.
शतप्रतिशत भाजप विरुध्द महाविकास
बंडाळीनंतर शिंदे गटाच्या साथीने भाजपची जिह्यातील फळी मजबूत झाल्याचे सध्या तरी चित्र आहे. आतापर्यंत जिह्यातील बहुतांश मतदारसंघांत दमदार उमेदवाराच्या शोधात असलेल्या भाजपची यानिमित्ताने शोध मोहीम संपणार आहे. दहापैकी शिवसेनेची सहा व भाजप मित्रपक्षाची दोन विधानसभा मतदारसंघांत ताकद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे कागल व चंदगड असले तरी प्रा. मंडलिक यांच्या बंडाने भाजपला बळ मिळू शकते. या गणिताच्या आधारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून कोल्हापुरातील सर्व दहा आमदार आपलेच ही यापूर्वीची तथ्यपूर्ण घोषणा पूर्ण करण्यासाठी जिकिरीचे प्रयत्न केले जातील. आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, आमदार पी. एन. पाटील यांना समझोता एक्स्प्रेसचे डबे एकमेकाला घट्ट ठेवावे लागतील. शहर उत्तर आणि दक्षिण, करवीर, हातकणंगलेत काँग्रेसची मोठी ताकद आहे. शिवसेनेला नव्या चेहऱयांना संधी द्यावी लागणार असल्याने पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. लोकसभेच्या दोन जागा खेचून आणण्यासह किमान सहा जागांवर विजयश्री खेचण्याचे मोठे आव्हान ठाकरे यांच्या शिलेदारांपुढे असेल.
जिंकण्यासाठी नव्हे तर पाडण्यासाठी मतदानाची परंपरा
मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरकरांनी प्रस्थापितांचा धक्का देण्याची आपली परंपरा कायम राखली होती. विधानसभेसाठी काँग्रेसचा भोपळा फोडला तर भाजपला शुन्यावर ठेवले. शिवसेना सहावरुन एका जागेवर घसरली. राजू शेट्टी आणि धनंजय महाडिक या दिग्गजांचे पुन्हा लोकसभेच्या माध्यमातून दिल्लीचे स्वप्न भंगले होते. कोल्हापूकरांनी दोन अपक्षांना विधानसभेत पाठवले. राष्ट्रवादी काँग्रेसने दोन आमदारांचा कोटा कायम राखला. कोणाला निवडून आणण्यासाठी नव्हे तर पाडण्यासाठीच मतदान करत असल्याची प्रचिती विधानसभा आणि लोकसभा निकालातून कोल्हापूरकरांनी पुन्हा एकदा दाखवून दिली होती. कोल्हापूरच्या मतदारांचा ठाव लागत नसल्यानेच आगामी काळातील निवडणुकीचा निकाल त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असणार आहे.