कोयत्याने गळा चिरला, संशयीत पोलिसात हजर
प्रतिनिधी/कोल्हापूर
अनैतिक संबंधातून महिलेचा कोयत्याने सपासप वार करुन गळा चिरुन निर्घुण खून करण्यात आला. कविता प्रमोद जाधव (वय 38 मुळ रा. कसबा तारळे सध्या रा. लाईन बाझार) असे मृत महिलेचे नांव आहे. या प्रकरणी राकेश शामराव संकपाळ (वय 30 रा. कसबा बावडा) याला पोलिसांनी अटक केली आहे. खूनानंतर राकेश संकपाळ स्वतःहून पोलीस मुख्यालयामध्ये हजर झाला. कसबा बावडा लाईन बाझार परिसरात रविवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसर हादरला.
याबाबतची माहिती अशी, कसबा तारळे येथील कविता जाधव यांच्या पतीचे 4 वर्षापूर्वी निधन झाले आहे. त्यांना दोन मुली, एक मुलगा आहे. कविता जाधव शिवणकाम तसेच भावाच्या चपलाच्या दुकानामध्ये काम करुन उदरनिर्वाह चालवितात. अविवाहीत असणारा राकेश संकपाळ व कविता जाधव हे नातलग आहेत. दोन वर्षापूर्वी कविता यांची मुलगी आजारी पडली होती. या काळामध्ये कसबा बावडा येथे आई, वडील, भावासोबत राहणाऱ्या राकेशने कविताला मदत केली होती. यातून या दोघांची मैत्री झाली. कालांतराने मैत्रीचे रुपांतर प्रेमामध्ये झाले.
गेल्या 2 वर्षापासून कविता व राकेश यांचे प्रेमसंबंध होते. राकेश कविताकडे वारंवार लग्नाची मागणी करत होता. मात्र कविताने नकार दिला. यातून या दोघांमध्ये महिन्याभरापासून वाद सुरु होता. दोन दिवसांपासून वाद विकोपाला गेला. शनिवारी रात्रीही दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद मिटविण्यासाठी राकेशने कविता व त्यांच्या भावाला रविवारी सकाळी घरी भेटण्यास बोलाविले. 12 वाजण्याच्या सुमारास कविता व तिचा भाउ राकेशच्या घरी आले. यावेळी राकेशने पुन्हा लग्नाचा विषय काढला. कविताच्या भावाने कविताला समजावून सांगून लग्न करण्याचा सल्ला दिला. कविताचा भाउ दोघांची समजूत काढून कसबा तारळे येथे निघून गेला. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. झटापटही झाली. यातून चिडून राकेशने कवितास मारहाण करण्यास सुरुवात केली. संतापलेल्या राकेशने जवळच असलेल्या धारदार कोयत्याने कविताच्या गळ्यावर जोरदार वार केला. यामुळे कविताची अर्धीमान तुटली. त्यानंतरही राकेशने तिच्या मानेवार सपासप 6 वार केले. रक्ताची धार लागल्यामुळे संपूर्ण खोलीमध्ये रक्ताचे डाग पडले होते. राकेशच्या कपडय़ांवरही रक्ताचे डाग पसरले होते.
हे ही वाचा : गुप्तधनाच्या लालसेपोटी कोल्हापुरातील महिलेचा खून ; संशयिताला अटक
पुर्वनियोजीत कट
राकेशने दोन दिवसांपूर्वीच कोयता विकत आणून ठेवला होता. नियोजन करुनच राकेशने त्याच्या आई, वडीलांना गावी देवाला तेल घालण्यासाठी पाठवले. त्याचा भाउही शिवाजी विद्यापीठामध्ये कामास गेला होता. हिच वेळ लक्षात घेवून त्याने कविताला रविवारी सकाळीच भेटण्यास बोलविले. आणि डाव साधला.
तीन दिवसांत दोन महिलांचे खून
गुप्नधनाच्या शोधामध्ये शुक्रवारी सकाळी आरती अनंत सामंत हिचा पाडळी येथे डोक्यात विट घालून खून झाला. तर रविवारी कविता जाधव यांचा खून झाला. खूनाच्या घटनेनंतर आरोपी राकेश स्वतःहून पोलीस मुख्यालयामध्ये दाखल झाला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये गेला. तेथील अधिकाऱयांना त्याने आपण खून केल्याचे सांगितले. अधिकाऱयांनी त्याला ताब्यात घेवून त्याच्याकडे चौकशी केली. खून झालेल्या ठिकाणाचा पत्ता घेवून तेथे पडताळणी केली. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या एका पथकाने घटनास्थळी पाहणी केली असता, तेथे महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडल्याचे दिसून आले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक संजय गोर्ले, शाहूपुराचे निरीक्षक राजेश गवळी यांच्यासह पथकाने भेट देवून पाहणी केली. घरातील भिंतीवर, दरवाजाबाहेरही रक्ताचे डाग दिसले. खूनानंतर राकेशने बदललेली कपडेही पोलिसांना घटनास्थळी मिळून आली.
मुलीला भेटण्याचे राहून गेले
कविता जाधव यांची मोठी मुलगी डि फार्मसीचे शिक्षण घेते. तिला भेटण्यासाठीच त्या रविवारी सकाळी कोल्हापूर येथून जाणार होत्या. त्यांनी घरातून पोळ्याही करुन आणल्या होत्या. दुपारी त्या राकेश सोबतच मुलगीस भेटण्यास जाणार होत्या.
लग्नास नकार, पैशाची मागणी
राकेशने कविताला लग्नाची मागणी घातली होती. मात्र कविता नकार देत होती. तसेच राकेशकडे वारंवार पैशाची मागणी करत होती. फर्निचर दुकानात काम करणाऱया राकेशचा पगार जेमतेम असल्यामुळे वारंवार होणाऱया पैशाच्या मागणीला तो कंटाळला होता. यातूनच त्याने खून केल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.