प्रतिनिधी / सातारा :
पाले टाकून राहणाऱ्या पारधी समाजासाठी शासनाची जागेसह घरकूल योजना आहे. तरी देखील प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ लोकसाहित्यिक अण्णाभाऊ साठे कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष व दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी धरणे आंदोलन सुरु करण्यात आले.
दरम्यान, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आंदोलकांना गुरुवार दि. 16 रोजी तातडीची बैठक घेवून यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने या आंदोलनाबाबत उद्या निर्णय घेवू, असे उमेश चव्हाण यांनी सांगितले. तर सातारा जिल्हय़ातील पारधी समाजाला शासकीय जागा मिळण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे यांनी मंत्रालय पातळीवर प्रयत्न केल्यामुळे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी जागृत्ती कुमरे यांनी जिल्हय़ातील पारधी समाजाला जागा व घरकुले देण्याबाबत सातारा जिल्हा प्रशासन विभागाशी संपर्क साधून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यात येईल असे कळवले आहे.
पारधी समाजाला जागेसह घरकूल देण्याचा अहवाल तयार करण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे यांनी पाठपुरावा केल्यामुळे सातारा जिल्हय़ातील 11 तालुक्यांसाठी चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे लेखी पत्रही आमदार शिंदे यांना देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल उमेश चव्हाण यांनी त्यांचे जाहीर आभार मानले आहेत.
या आंदोलनाला भाईज्या भोसले, नम्या भोसले, यंत्र्या भोसले, डिया भोसले, पितांबर भोसले, विजय शिंदे आदी पारधी समाजातील नागरिक उपस्थित होते.