प्रतिनिधी/ सावंतवाडी
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यापारी संघाला तीन दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याची विनंती केली होती. त्यानुसार मंगळवारी व्यापाऱयांनी बाजारपेठ बंद ठेवली. सर्व किराणा, भाजीपाला दुकाने बंद ठेवण्यात आली. नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी सकाळपासून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे बाजारपेठत शुकशुकाट होता. दरम्यान, प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी किराण दुकाने सुरू राहतील, असे स्पष्ट केले. परंतु दुपारनंतरही बाजारपेठेतील दुकाने बंद होती. पेट्रोलपंप आणि तसेच शहरातील एकच मेडीकल दुकान सुरू होते. दंगल नियंत्रण पथकही शहरात कार्यरत होते. किराणा दुकाने सुरूच राहणार आहेत. पालिकेने आणि व्यापारी संघाने शहरात जंतूनाशक फवारणी करण्यासाठी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता, असे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी सांगितले. तर नगर पालिकेतर्फे शहरात ठिकठिकाणी जंतूनाशक फवारणी करण्यात आली.
प्रशासनात सुसुत्रता आवश्यक!
कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. सध्या कोरोनाचा संक्रमण काळ आहे. त्यामुळे नगराध्यक्ष परब यांनी तीन दिवस गर्दी टाळण्यासाठी बाजारपेठ बंद ठेवण्याची विनंती व्यापारी संघाला केली होती. त्यानुसार व्यापाऱयांनी बाजारपेठ मंगळवार, बुधवार, गुरूवार दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजीपाला स्टॉल प्रभागवार सुरू करण्यात आले होते. तेही बंद होते. मात्र, तहसीलदारांनी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. यामुळे प्रशासनात सुसुत्रता नसल्याचे यातून दिसून आले. त्यामुळे निर्णय घेताना प्रशासनातील सर्व घटकांनी ताळमेळ ठेवण्याची गरज आहे. अन्यथा गोंधळ होण्याची शक्यता असते.
दरम्यान, पालिकेने प्रभागात जंतूनाशाक फवारणी सुरू केली आहे. प्रभागातील नगरसेवक कर्मचाऱयांच्या सहकार्याने ही फवारणी करून घेत आहेत.