प्रतिनिधी/ रत्नागिरी
मार्च महिन्यापासून सलग तीन महिने वीज वितरण कंपनीचा कोणताही कर्मचारी ग्राहकांच्या घरी येऊन रीडिंग घेतलेले नाही. अशावेळी वीज युनिट अंदाजे टाकून अवाच्या सव्वा बिल ग्राहकांना दिल्याने अडचणीच्या काळात वितरण कंपनीकडून ग्राहकांना वाढीव बिलाचा शॉक देण्यात आला आहे. त्यामुळे वाढीव वीज बिलांच्या तक्रारींचा पाढा वाचण्यासाठी येथील महावितरण कार्यालयात वीज ग्राहकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे.
कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर गेल्या मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू करण्यात आले होते. लॉकडाउनच्या काळामध्ये वीज वितरण कंपनीचा कोणताही कर्मचारी थेट ग्राहकांच्या घरी मीटर मध्ये बिल घेण्यासाठी आला नाही. अनेक वीज ग्राहकांनी मार्च महिन्यांची प्राप्त झालेली वीजबिले तात्काळ संबधित कार्यालयात तर ऑनलाईन पध्दतीने भरणा केली. लॉकडाऊनच्या तीन महिन्यानंतर ग्राहकांना काही दिवसांपासून बिल येण्यास सुरुवात झाली आहेत.
मात्र वीजबिले तीन महिन्याचे सलग एकाच वेळेस बिल आले आहे. वीजबिल मोठय़ा प्रमाणात वाढीव आल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सामान्य ग्राहकांना महिन्याला 200, 300 ते 350 रुपये येत होते. त्यांना तीन महिन्याचे सलग 3 हजार ते त्यापेक्षा अधिक रक्कमेची बिल आकारण्यात आली आहे. ग्रामीण भागामध्ये घरगुती वापरावयाची विज अतिशय कमी प्रमाणात वापरली जाते. जास्त वीज खर्च होईल असे कोणत्याही प्रकारचे उपकरण ग्रामीण भागातील लोकांकडे नसते. ग्रामीण भागातील सामान्यांसह शहरी भागातील सर्वच लहान-मोठय़ा वीज ग्राहकांना महावितरण कंपनीने अव्वाच्या सव्वा वीजबिले पाठवून धक्का दिला आहे.
त्याबाबत वीज ग्राहकांत संताप पसरला आहे. अगोदरच लॉकडाऊनमुळे सर्व दैनंदिन व्यवहार कोलमडून पडलेले आहेत. अनेकांची रोजगारातून मिळणाऱया आर्थिक उत्पन्नाची घडी विस्कटली आहे. वीज वितरण कंपनीने युनिटची शहानिशा करून योग्य ती वीज बिलाची आकारणी करावी अशी मागणीने वीज ग्राहकांनी जोर धरला आहे. अन्यथा वीज बिल भरणा करणार नसल्याचे ग्राहकांकडून सांगण्यात येत आहे. वितरण कंपनीने तात्काळ मागील युनिट नुसार बिल दय़ावीत. वाढीव आलेली वीजबिल आम्ही भरणार नसल्यची चर्चा ग्राहकांमध्ये सुरू झाली आहे. सोमवारी रत्नागिरीतील नाचणे येथील महावितरणच्या कार्यालयात वाढीव वीजबिलाच्या तक्रारींचा पाढा वाचण्यासाठी वीज ग्राहकांनी मोठी गर्दी पेली होती. त्यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा जणू फज्जा उडाल्याचे चित्र होते. वीजबिले कमी करून देण्यासाठी देखील महावितरणच्या कर्मचाऱयांकडून कार्यवाही केली जात होती.