प्रतिनिधी/ कोल्हापूर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. करवीर निवासनी अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर, त्र्यंबोली मंदिर, श्री सिद्धीविनायक मंदिर, दत्तभिक्षालिंग मंदिर यांच्यासह सिंधुदर्ग, सांगली जिल्हय़ातील 3042 मंदिरे सोमवार (दि. 5) पासून दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
यात म्हटले आहे, राज्यामध्ये वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात देवस्थान समितीच्या कार्यालयामध्ये सोमवारी तातडीची बैठक झाली. यावेळी कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, सदस्य शिवाजी जाधव, राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार, शितल इंगवले, सुयश पाटील, आरती नांद्रेकर यांची उपस्थिती होती.
या बैठकीत देवस्थान समितीकडे व्यवस्थेस असलेल्या अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर, त्र्यंबोली मंदिर, सिद्धीविनायक मंदिर, दत्तभिक्षालिंग मंदिर यांच्यासह सिंधुदर्ग, सांगली जिल्हय़ातील 3042 मंदिरे भाविकांना दर्शनासाठी 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाला. राज्य शासनाकडून पुढील आदेश येईपर्यंत मंदिरे बंद राहणार आहेत. मात्र, मंदिरातील धार्मिक कार्यक्रम, पूजाअर्चा, आरती सुरू राहील. देवस्थान समितीचे सर्व कर्मचारी, मंदिराचे कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी यांची कामे सुरू राहतील. या व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश नसणार आहे. मंदिराच्या दरवाजामध्ये भाविकांनी गर्दी करू नये.
जोतिबा यात्रा, अंबाबाई मंदिराचा रथोत्सवही रद्द
मंदिर बंद कालावधीमध्ये 26 एप्रिल रोजी असलेली जोतिबाची चैत्र यात्रा तसेच 27 एप्रिल रोजी अंबाबाई मंदिराकडील रथोत्सवही रद्द करण्यात आला आहे. परंतु यात्रा कालावधीतील होणारे धार्मिक विधी, पूजाअर्चा नियमाप्रमाणे पूर्ण होतील. यात्रा आणि रथोत्सव जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून मागील वर्षीप्रमाणेच साजरे होतील, गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असेही महेश जाधव यांनी सांगितले.