अध्याय अकरावा
मुक्ताचे विषयसेवन असे असते की, विषयांतसुद्धा त्यांना ब्रह्मभावच स्फुरत असतो. म्हणून पापपुण्ये उद्भवतच नाहीत. त्यामुळे त्यांना नित्यमुक्ति प्राप्त होते. मुक्त मनुष्य हा समाजात अत्यंत विरळा असतो. त्याला देहाची कुठलीच बंधने लागू नसतात. मुक्त पुरुष कुणाला म्हणावे हे समजून घ्यायचं असेल तर संत चरित्रे अभ्यासावीत. संत कुठल्याही काळातले असोत, कुठल्याही भागातले असोत त्यांचं समाजातील वर्तन एकसारखच आढळतं कारण ते सर्व एकाच मुशीतून तयार झालेले असतात. ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविशी हाती धरोनिया’ असं तुकोबा म्हणतात. त्याप्रमाणे सगळे मुक्त पुरुष वागत असतात. म्हणून त्या सर्वांचं वागणं एकसारखं होत असतं. सर्वांना ते समान वागणूक देतात. त्यांच्यातील अपपर भाव मावळलेला असतो. ते सर्वांच्यात ईश्वरी अस्तित्वाचा अनुभव घेत असतात. मुक्त लक्षणे सविस्तर सांगून झाल्यावर भगवंत उद्धवाला आता बद्ध लक्षणे सांगत आहेत. भगवंत म्हणाले, उद्धवा आता बद्धाची गोष्ट ऐक. तो अकर्ता असूनही स्वतःला कर्ता समजतो आणि त्यामुळेच सर्वतोपरी गुंतत जातो. अरे, मनुष्याचे शरीर हे प्रारब्धाधीन आहे. तेथे हरिहर जरी आले तरी त्यांनासुद्धा त्यात अणुरेणूइतकाही बदल करिता येत नाही हे तत्त्व वेदशास्त्रांनासुद्धा संमत आहे.
देहामध्ये ज्या गुणाचे प्राधान्य असते, त्याप्रमाणेच कर्म घडत असते. आणि इंद्रियेही गुणांच्या आधीन असल्यामुळे, तीही तदनुसारच वागत असतात. असे असतानाही तो मी कर्ता असे म्हणतो. तेच त्याच्या दृढ बंधनाचे कारण असते. या कारणामुळे तो स्वतःच स्वतःचा घात करतो. नळीतल्या चण्यांच्या आशेने वानर नळी मुठीत धरतो आणि त्यामुळेच तो फशी पडतो, त्याप्रमाणे जीव देहाच्या विषयविलासाला फशी पडतो. अहं आणि ममता याला तो भुलतो. त्याच्या हातून प्रकृतीच्या त्रिगुणांमुळे कर्म होत असते पण ते तो मी केले या भ्रमात असतो. या भ्रमानेच त्याला त्या कर्तेपणाचा अहंकार वाटू लागतो. केलेल्या कर्माबद्दल प्रेम दाटून येते. हा अहंकार आणि प्रेम यामुळे त्या जीवाला अनिवार्य म्हणजे न टाळता येणारी बद्धता प्राप्त होते ! खाली काजळ पसरून वर पांढरा शुभ्र स्फटिक ठेवला, तर त्याचा पांढरेपणा लोपून तो काळाच दिसू लागतो. त्याप्रमाणे जीव हा आंधळा झालेला असतो. आंधळा हत्ती माजला म्हणजे त्याला आपण खड्डयात पडू हे लक्षात येत नाही, त्याप्रमाणे जीव हा आंधळेपणाने कर्म करत असतो. हे कर्म करून आपण अधोगतीला जाऊ हा विचारच त्याच्या मनात येत नाही. मी देह, मी कर्मकर्ता, मी ज्ञाता, मी विषयभोक्ता असा जो देहाच्या मीपणाचं सतत प्रदर्शन करत असतो त्याचंच नांव दृढबंधन.
मुक्त आणि बद्ध या अवस्था ज्ञान आणि अज्ञान यामुळे मनुष्यात येत असतात. येथे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान हे लक्षात घे. आत्मज्ञानामुळे मी कर्ता नाही हे पक्के लक्षात राहते. तसेच जीवनात घडणाऱया गोष्टी ईश्वरी इच्छेनुसार घडत आहेत आणि त्या माझ्या हिताच्या आहेत याची खात्री वाटते. ज्ञानी हा माझा आत्मा आहे हे मी यापूर्वी रणभूमीवर अर्जुनाला सांगितले आहे. ज्ञानी व्यक्तीची लक्षणे कितीहीवेळा सांगितली तरी माझं मन भरत नाही म्हणून तेच गुह्य परमप्रीतीने मी तुला सांगतो. ज्ञान्याची मुक्तस्थिती यथार्थ रीतीने सांगणे हेच माझे अंतस्थ मनोगत होय.
नाथबाबा म्हणतात, ज्ञानी भक्तांची गोडी श्रीकृष्णालाच काय ती ठाऊक आणि कृष्णभजनाची गोडी तशा भक्तांनाच ठाऊक असते. आधीच ही मुक्तांची कथा त्यात श्रीकृष्णासारखा वक्ता तेव्हा उद्धवाच्या भाग्याचे वर्णन काय करावे ? उद्धव हा अर्जुनासारखाच किंबहुना त्याच्याहूनही थोर म्हंटला पाहिजे कारण श्रीकृष्ण आणि अर्जुन हे नरनारायणच होते, म्हणून कृष्णाने अर्जुनाला गुह्य ज्ञान सांगितले. तीच ज्ञानाची कथा फिरून श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितली. ह्यावरून खरोखर उद्धवाइतके भाग्य दुसऱया कोणाचेच दिसत नाही. निजधामाला जावयाचे सोडून व आपल्या इच्छा बाजूस सारून भगवंतांनी एवढे निरूपण केले, त्याअर्थी श्रीकृष्ण उद्धवाच्या प्रेमांत गुंतला होता ह्यांत शंकाच नाही.
क्रमशः