मायावतींकडून लक्ष्य ः अमित शाह यांचे कौतुक
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान बसप सर्वेसर्वा मायावती यांनी मतदान केल्यावर पत्रकारांशी संवाद साधला आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे नकली आंबेडकरवादी असल्याचे मायावतींनी यावेळी म्हटले आहे. तर गृहमंत्री अमित शाह यांनी बसप चुरशीने निवडणूक लढत असल्याचे नमूद पेले होते. याप्रकरणी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मायावती यांनी शाह यांचा हा मोठेपणा आहे की त्यांनी सत्य स्वीकार केले असे म्हटले आहे.
बसपला केवळ दलितांची नव्हे तर मुस्लीम आणि अतिमागास वर्ग अन् सर्व समाजाच्या लोकांची मते मिळत आहेत. निकाल लागेल तेव्हा कुणाचे किती बळ आहे स्पष्ट होईल. भाजप आणि समाजवादी पक्षाचे सरकार स्थापन करण्याचे दावे तेव्हा फोल ठरणार आहेत. 2007 प्रमाणे बहुजन समाज पक्ष पुन्हा सरकार स्थापन करणार असल्याचा पूर्ण विश्वास असल्याचे त्या म्हणाल्या.
समाजवादी पक्ष लक्ष्य
लोकांना घरातून बाहेर पडत मतदानाचे आवाहन करताना मायावतींनी समाजवादी पक्षावर निशाणा साधला आहे. समाजवादी पक्षाला मुस्लिमांनी मतदान केल्याचा दाव्यावर बोलताना मायावतींनी क्षेत्रात जाऊन याचे सत्य पडताळू शकता असे पत्रकारांना उद्देशून सांगितले आहे. ज्या मतदारसंघांमध्ये मुस्लीम उमेदवार तयारी करत होते, त्यांना समाजवादी पक्षाकडून तिकीट देण्यात आलेले नाही. समाजवादी पक्षाच्या कार्यशैलीची सर्वांनाच जाणीव आहे. माझी चिंता करणे सोडून देत यादव समुदायाची मते समाजवादी पक्षाला मिळत आहे की नाही याची काळजी अखिलेश यांनी करावी असा टोला मायावतींनी लगावला आहे.
अखिलेश यांच्यावर टीकास्त्र
अखिलेश यादव हे आंबेडकरवादी असते, तर आमच्याकडून सुरू करण्यात आलेली कामे आणि जागांची नावे स्वतःचे सरकार असताना बदलली नसती. समाजवादी पक्षाचे सरकार स्थापन करण्याचे स्वप्न भंगणार आहे. 2007 प्रमाणेच बसपचे पूर्ण बहुमताचे सरकार येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
सपकडून दलित-मागासांचे शोषण
समाजवादी पक्षाचे सरकार सत्तेवर असताना मागास-दलित आणि गरीबांचे सर्वाधिक शोषण झाले आहे. ब्राह्मण समुदायाचा छळ देखील समाजवादी पक्षाचे सरकार असताना झाला आहे. अखिलेश यादव केवळ वक्तव्ये करून वातावरण निर्मिती करू पाहत आहेत. सप कार्यकर्त्यांच्या डोक्यात आताच हवा शिरली आहे. सप सरकारच्या काळात राज्यात मोठय़ा प्रमाणावर दंगली घडल्या. मुजफ्फरनगर दंगल हे समाजवादी पक्षाच्या सरकारचे उदाहरण आहे. समाजवादी पक्षाला राज्याच्या जनतेने निकालापूर्वीच नाकारले आहे. सप सरकार येणे म्हणजे गुंडगिरी आणि माफियाराज हे जनता ओळखून असल्याचे मायावती म्हणाल्या.