कोरोना रूग्णसंख्या घटते आहे. कोरोना निर्बंध शिथिल होत आहेत. देश अनलॉक होणार आणि मास्कमुक्ती दूर नाही असे सांगितले जाते आहे. याचबरोबर यंदा मान्सूनचा पाऊस चांगला व पुरेसा असे अंदाज व्यक्त झाले आहेत. आनंदाच्या या व अशा बातम्या येत असताना जगावर पुन्हा युद्धाचे ढग जमा झाले आहेत एकीकडे ही युद्धवार्ता तर दुसरीकडे देशांतर्गत नितीशकुमार-भाजप संबंध बिघडणार असे दिसते आहे. महाराष्ट्रात रोज चिखलफेक सुरू आहे. पाच राज्यांचा निवडणूक निकाल काय येतो हे महत्वाचे आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक तोंडावर आहे. विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर आहे. असे अनेक राजकीय ताणतणाव असताना महाराष्ट्रात पुन्हा एक मंत्र्याची संपत्ती संचनालयामार्फत अर्थात ईडीमार्फत चौकशी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाव मलिक यांना बुधवारी पहाटे ईडी अधिकाऱयांनी चौकशीसाठी उचलले आहे. मलिक यांना अटक झाली व त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला. मलिक यांचे दाऊद कनेक्शन त्यांना महाग पडेल असे दिसते. तथापि राष्ट्रवादी काँग्रेस व त्यांचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांची पाठराखण केली आहे व राष्ट्रवादी काँग्रेसने ईडी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनीही या चौकशीचे सूडबुद्धीची कारवाई असे वर्णन केले आहे. तर किरीट सोमय्या यांनी नवाब मलिक तुरूंगात जाणार असे म्हटले आहे. कोरोना संकट आणि मंत्र्यांची प्रकरणे, भानगडी, उचापती यामुळे महाराष्ट्रात महाआघाडी सरकारला काम करायला सवडच मिळालेली नाही. मुख्यमंत्री घरात बसून कारभार सांभाळतात आणि मंत्र्यांची प्रकरणे एका मागून एक समोर येत आहेत. त्यातच संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांचे रोजचे डेली सोप आहेतच. जोडीला नारायण राणे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, एकनाथ खडसे असे आहेतच. ओघाने जगावर रशिया व युक्रेनमुळे युद्धाचे ढग जमले असले तरी राज्यातही फार वेगळी स्थिती नाही. राज्य सरकार स्थिर असले तरी त्यातील घटक पक्षाचे वाद आणि विरोध दडून राहिलेले नाहीत. पुण्यात तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते ओबीसी आरक्षणावरून एकमेकांवर चालून गेले. कार्यकर्त्यांत मारामारी झाली, राडा झाला. काही दिवसापूर्वी किरीट सोमय्या यांनाही पुण्यात ढकलाढकली करत पाडण्यात आले होते. या सर्व घटना पुरोगामी प्रगत महाराष्ट्राला फारशा शोभादायक नाहीत. पण यांचे कोणालाच भान व सोयरसुतक उरलेले नाही. रशिया व युक्रेनच्या दरम्यान तणाव वाढला आहे. रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या दोनेत्स्क आणि लुहान्स्क या दोन प्रांताना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली. युक्रेन बंडखोरांनी ताठर भूमिका घेतली आहे. पुतीन यांना आम्ही घाबरत नाही असे म्हटले आहे. रशियाच्या या कारवाई नंतर जगात दोन तट पडताना दिसत आहेत. ओघानेच तेथे आणि जगावर युद्धाचे ढग घोंगाऊ लागलेत. भारताने उभय बाजूना चर्चेने वाद सोडवावा, असे आवाहन केले आहे. अमेरिकेने या वादात भाग घेतला आहे. चीननेही संयमी भूमिका घेतली आहे. पण चीन आणि रशिया यांचे गुफ्तगु आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने आपत्कालीन बैठक घेवून चिंता व्यक्त केली आहे. युद्धाचे ढग आल्याने जगभर चिंता व भिती आहे. शेअरबाजार कोसळले आहेत. तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. महागाई तर वाढतेच आहे. अनेक देशांची अर्थव्यवस्था संकटात आहे. खरे तर अशा या संकटात भारताने सामुदाईक निर्धार व दिशा घेवून काम केले पाहिजे. पण घोटाळे, लफडी, भ्रष्टाचार, राजकीय हिशोब, जातियता आणि डाव-प्रतिडाव यामध्ये राजकीय मंडळी रूतली आहेत. वरपासून खालीपर्यंत हेच सुरू आहे. सर्वांना भस्म्या रोग झाला आहे. कुठे बेनामी संपत्ती घेतली आहे. कुठे निविदा मॅनेज केल्या जात आहेत. कुठे अवैध बांधकामे तर कुठे लाच घेतली जात आहे. बँकेचे घोटाळे आहेतच. देशाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली पण कालचा दिवस बरा असे म्हणायची रोज वेळ येते आहे. साक्षरता वाढली आहे. पण शहाणपणा, चांगुलपणा वाढलेला नाही. महाआघाडीचे मंत्री एकामागून एक अडचणीत येत आहेत. संजय राऊत यांनी ईडी अधिकारी व भाजपा नेत्यांना सुनावले आहे. भाजपाचे साडेतीन शहाणे तुरूंगात असतील त्यांच्यासाठी तुरूंग सॅनिटायझर केला जातोय असे राऊत म्हणत आहेत. तर किरीट सोमय्या महाआघाडीचे भ्रष्ट मंत्री तुरूंगात घालणार असे सतत सांगत आहेत. महाराष्ट्रापुढे बेरोजगारीचा प्रश्न तीव्र आहे. शेतकऱयांची वाट लागली आहे. सहकारी कारखाने व संस्था आजारी पाडून गिळल्या जात आहेत. जिकडे तिकडे वसुली सुरू आहे. शिक्षण, शाळा वाट लागली आहे. जातीय मतपेटय़ासाठी राजकीय पक्षांनी विद्वेष पेरला आहे. एकूणच जगावर जितके युद्धजन्य ढग जमा आहेत तितकेच महाराष्ट्रावर आहेत. आम्हीच आमचे वैरी झालो आहोत आणि लहान माणसांच्या सावल्या मोठय़ा पडत आहेत. रोज एक घोटाळा व तमाशा सुरू आहे. यातून कोणता विकास होणार आणि महाराष्ट्र हित कसे साधणार यांचा विचार करायला हवा. राजकीय पक्ष व नेते असा विचार करायला असमर्थ वा अपात्र असतील तर जनतेनेच आता यावर उपाय शोधला पाहिजे. खरे तर दाऊद हा कुख्यात गुंड आहे. मुंबई बॉम्बस्फोटासह मनीलॉड्रींगशी आणि अंमली तस्करीशी त्यांचे व टोळीचे संबंध दिसून आले आहेत. देशातले व राज्यातले पोलीस वा केंद्रीय यंत्रणा तपास करत असतील तर त्यांना सर्वांनी मदत केली पाहिजे. या गुन्हेगाराशी संबंधित सर्वांची सखोल चौकशी केली पाहिजे. पण राजकारणच साधायचे आणि सत्ता वापरून घरे भरायची हाच उदय़ोग व उद्दीष्ट असेल तर अवघड आहे. नबाब मलिक यांच्या चौकशीनंतर वेगवेगळय़ा नेत्यांनी, पक्षांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या बोलक्या आहेत. त्यातून त्या नेत्यांची व पक्षाची भूमिका व दृष्टीकोन दिसतो.
Previous Articleअखिलेश यांची मयंक जोशींनी घेतली भेट
Next Article अखिलेश यांनी ‘यादव’ मतांची चिंता करावी!
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.