राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून शिक्कामोर्तब
@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कृषी कायदे माघारी विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वतःचे शिक्कामोर्तब केले आहे. याचबरोबर तिन्ही कृषी कायदे आता रद्दबातल ठरले आहेत. यापूर्वी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 29 नोव्हेंबर रोजी संसदेतील दोन्ही सभागृहांमध्ये तिन्ही कृषी कायद्यांच्या माघारीचे विधेयक संमत झाले होते. या कायद्यांच्या विरोधात मागील एक वर्षापासून शेतकऱयांनी आंदोलन सुरू आहे.
सोमवारी लोकसभेत कृषी कायदे माघारी विधेयक संमत झाले, त्यानंतर राज्यसभेतही ते संमत करविण्यात आले. तर सिंघू सीमेवर बुधवारी होणार शेतकऱयांच्या 40 संघटनांची बैठक रद्द करण्यात आली आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या अनेक संघटनांनी या बैठकीपासून अंतर राखण्याचा प्रयत्न केला. संयुक्त किसान मोर्चाची बैठक 4 डिसेंबर रोजी होणार आहे. या बैठकीत आंदोलन संपुष्टात आणावे की नाही यावर निर्णय होणार आहे.
कृषी कायदे रद्द करण्यात आल्यावर दिल्ली सीमेवर सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यासंबंधी शेतकरी संघटनांमधील मतभेद आता ठळकपणे समोर आले आहेत. शेतकऱयांचा एक गट आंदोलन मागे घेण्याच्या मताचा आहे. तर दुसरा गट सरकारने एमएपीची हमी द्यावी अशी मागणी करत आहे.t