शेकडो समर्थकांसह केला भाजपात प्रवेश
प्रतिनिधी /पणजी
दोन वेळचे पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी शुक्रवारी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या साक्षीने भाजपात प्रवेश केला. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते कोणत्या पक्षात प्रवेश करतील याबद्दल लोकांना उत्सुकता लागून राहिली होती.
शुक्रवारी त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, सदानंद तानावडे, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, ग्लेन टिकलो, खासदार विनय तेंडुलकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, गुरूप्रसाद पावसकर, जि.पं. सदस्य कविता नाईक, आदींची त्यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमास मोठय़ा संख्येने महिला उपस्थित होत्या.
त्यावेळी बोलताना श्री. खंवटे यांनी, मतदारसंघातील पंच, सरपंच, झेडपी तसेच कार्यकर्ते आणि समर्थक यांच्याशी सल्लामसलत व त्यांना विश्वासात घेऊनच भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे सांगितले.
आमदारकीच्या मधल्या काळात सुमारे अडीज वर्षे आपणास सत्ता मिळाली. त्यातून मतदारसंघाचा शक्य तेवढा विकास करण्याचे प्रयत्न केले असे त्यांनी सांगितले. विरोधात असताना मुख्यमंत्री, सरकार आणि भाजपवर अनेक आरोप, टीका केली. विधानसभेतही सरकारविरोधात कठोर शब्दांनी बोललो. परंतु ते सर्व काही राज्य आणि मतदारसंघाच्या हितासाठी होते. त्यात वैयक्तिक काहीच नव्हते, असे खंवटे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधताना त्यांनी बाहेरून आलेला एक राजकीय पक्ष ’खेळ होणार’ अशी भाषा करतो. मात्र आपण गोमंतकीयांना कोणाच्याही हातातील खेळणे होऊ देणार नाही, असे ठाम मत व्यक्त केले.
खंवटे यांच्या प्रवेशामुळे बार्देश तालुक्यात भाजपा आता अधिक मजबूत झाला आहे, असे तानावडे यांनी सांगितले. अन्य अन्य मान्यवरांचीही भाषणे झाली.
खंवटे यांच्या पक्षप्रवेशामुळे आपण अत्यंत आनंदी झालो आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 2007 पासून आपण गोव्याशी संबंधित असून सर्व निवडणुकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. 2012 आणि 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत रोहन खंवटे यांच्या विरोधात आपण काम केले, मात्र आता पुढील निवडणुकीत तुमच्यासाठीच काम करणार, असेही फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बोलताना येत्या विधानसभा निवडणुकीत 22 पेक्षा जास्त जागा मिळवून स्पष्ट बहुमताने जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. लोकशाहीत विरोध आणि टीका महत्वाची असते. त्याचमुळे खंवटे यांची टीका आम्हीही सदैव सकारात्मकतेनेच घेतली होती, असेही मुख्यमंत्री पुढे म्हणाले.
दरम्यान, भाजपात प्रवेश करण्यापूर्वी खंवटे यांनी प्रथम पणजीचे आराध्य दैवत असलेल्या देवी महालक्ष्मीचे दर्शन घेतले. त्यानंतर भाजप नेत्यांची भेट घेण्यासाठी दुपारी ते दिल्लीला रवाना झाले.