ग्रामपंचायत-संबंधित कंत्राटदाराचा बेजबाबदारपणा : ग्रामस्थांतून तीव्र संताप : शासनाचा निधी पाण्यात गेल्याची चर्चा
वार्ताहर /अगसगे
अगसगे ग्रामपंचायत आणि संबंधित कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे गावच्या मुख्य रस्त्यावर गेल्या 2 महिन्यापासून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. यामुळे ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध आणि सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती होऊ नये या उद्देशाने केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून यासाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर करुन घरोघरी नळजोडणी करण्याची योजना राबवली आहे.
या योजनेसाठी हलक्या दर्जाच्या पाईप आणि इतर साहित्य कंत्राटदाराने वापरले आहे. या विषयी ग्रामस्थांनी आक्षेप घेत ग्रामपंचायतीकडे तक्रारदेखील करण्यात आली होती. मात्र या विषयी ग्रामपंचायतीने कंत्राटदाराला जाब विचारला नसल्याचा आरोप ग्रामस्थांतून करण्यात आला आहे. यामुळेच सध्या बेळगाव-अगसगे मुख्य रस्त्या शेजारची पाईप फुटली आहे. यामुळे गेल्या दोन महिन्यापासून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.
पाईपलाईन दुरुस्त करावी म्हणून ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार देखील केली आहे. तरी देखील ग्रामपंचायतीने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. याविषयी ग्रामपंचायत कर्मचाऱयांना विचारले असता, या योजनेमध्ये पाईप फुटली किंवा कोणतीही बिगाड झाल्यास संबंधित कंत्राटदाराने दुरुस्त करून द्यायचे असते. आम्ही याविषयी कंत्राटदाराला कळविले आहे, अशी माहिती दिली. मात्र यांच्या दोघांच्या वादात दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असून शासनाचा निधी पाण्यात जात असल्याची चर्चा ग्रामस्थांतून होत आहे.
भ्रष्टाचार झाल्याचा आरोप
जलजीवन मिशन योजनेच्या कामामध्ये हलक्या दर्जाच्या पाईप व इतर साहित्य वापरण्यात आले आहे. सदर योजनेतील पाईप कमी दर्जाच्या वापरल्या आहेत म्हणून ग्रामपंचायतीकडे तक्रार केली होती. मात्र याबाबत ग्रामपंचायतीने काहीच विचारपूस केली नाही. कंत्राटदाराने हलक्या दर्जाचे साहित्य वापरुन काम केले आहे. यामुळे योजना राबवून सहा महिने देखील झाले नाही. त्याच्या आतच पाईप फुटण्याच्या घटना घडत आहेत. याकडे कंत्राटदार देखील लक्ष देत नाही. या कामाच्या निधीबाबत आणि कामाचा तपशील व कामाचा ग्रामपंचायतीने हस्तांतर घेतलेल्या विषयी सार्वजनिक माहिती अधिकाराखाली ग्रामस्थांनी दि. 31/5/22 रोजी अर्ज दिला आहे. मात्र अद्याप माहिती देण्यात आली नाही. या माहिती अधिकाराखाली अर्ज आल्यास एक महिन्यात संपूर्ण माहिती देणे कायद्यात आहे. मात्र अद्याप माहिती दिली नसल्यामुळे या योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप ग्रामस्थांतून होत आहे. योजना कितपत यशस्वी ठरणार आहे, अशी चर्चा ग्रामस्थांतून होत आहे. ग्रामपंचायत किंवा कंत्राटदाराने त्वरित पाईपलाईनला लागलेली गळती बंद करावी, अशी मागणी होत आहे.