गेली अनेक वर्षे सर्व जगामधील विशेषतः भारतामधील लोक ‘अच्छे दिन’ कधी येतील याची प्रतीक्षा करीत आहेत. पण प्रत्यक्षात दिवसेंदिवस परिस्थिती दयनीय व सर्वच दृष्टीने बिघडत जात असल्याचे आपण आज अनुभवत आहोत. हे असे किती काळ चालत राहणार? परिस्थिती सुधारण्यासाठी काय उपाय आहे का नाही? श्रीमद भागवत या ग्रंथामध्ये 5000 वर्षांपूर्वीच या विषयावर चर्चा करण्यात आली आहे आणि त्यावर उपायही सुचवला आहे.
सध्या आपण कलियुग म्हणजे कलह आणि दंभाने भरलेल्या युगातून जात आहोत. या युगातील लोकांचे वर्णन करताना या ग्रंथामध्ये सांगितले आहे की ‘दिवसेंदिवस बलवान काळाच्या योगाने धर्म, सत्य, पवित्रता, क्षमा, दया, आयुष्य, बळ व स्मरणशक्ती कमी कमी होत जातील. कलियुगातील प्रजा लोभी, दुराचारी, निर्दयी आणि अकारण एकमेकांशी वैर करणारी असेल. ती दुर्दैवी आणि भौतिक वासनांनी त्रस्त असेल आणि बहुतांशी अविचारी आणि असंस्कृत असेल. कलियुगात द्रव्य हेच मनुष्याचे कुल, शील व सद्गुण याच्या उत्कर्षाचे लक्षण मानले जाईल. तसेच धर्म आणि न्याय याचा निर्णय करण्याचे साधन बळ हेच राहील. देवघेवीच्या व्यवहारात कपटाचेच साम्राज्य पसरलेले आढळून येईल.
ब्राह्मण असण्याची खूण म्हणजे केवळ जानवे परिधान करणे एवढेच मर्यादित राहील व इतर गुणांचा अभाव असेल. मनुष्याचा आश्रम कोणता हे केवळ बाह्य वेशावरून ठरविले जाईल. कोणाजवळ द्रव्य नसल्यास त्याला न्याय मिळणे कठीण होईल व फटकळ बोलणे म्हणजेच पांडित्य मानले जाईल. द्रव्यहीनपणा हे दुर्जनत्वाचे लक्षण होऊन दांभिकपणा म्हणजेच साधुत्व ठरेल. शरीर अलंकृत करून नटणे हेच स्नान मानले जाईल. पुरुषांनी डोक्मयावर निरनिराळय़ा प्रकारच्या केशरचना करणे हेच सौंदर्याचे लक्षण मानले जाईल. पाऊस पडेनासा होऊन अथवा अतिवृष्टी होऊन दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण होईल. सरकारने आकारलेल्या निरनिराळय़ा करांच्या ओझ्याखाली सामान्य जनता चिरडून जाईल. भूक, तहान, रोगराई व काळजी यामुळे लोक त्रासून जातील व त्यामुळे मनुष्यांची आयुर्मर्यादा कमी कमी होत जाईल व शरीर क्षीण होत जाईल. राजेच दरोडेखोरासारखे वागतील. लोक चोरी करणे, खोटे बोलणे, विनाकारण हिंसा करणे असे मार्ग स्वीकारतील. जेव्हा घोर फसवणूक, असत्य, आळस, झोप, हिंसा, नैराश्य, शोक, मोह, भय, आणि दारिद्रय़ असते त्या काळाला कलियुग अथवा तमोगुणाचे युग म्हणतात. कलियुगाच्या दुष्प्रभावामुळे मनुष्य अदूरदर्शी, दुर्भागी, अत्याहारी, कामुक आणि धनहीन होतील आणि स्त्रिया स्वैराचारी होतील. महानगरात चोरांचे वर्चस्व असेल. नास्तिक लोक वेदांवर भाष्य करून त्यांना भ्रष्ट करतील. राज्यकर्तेच प्रजेचे भक्षण करतील तर तथाकथित ब्राह्मण आणि तथाकथित बुद्धिमान उदर आणि जननेंद्रियाच्या आधीन असतील. ब्रह्मचारी व्रतभंग करतील आणि अस्वच्छ राहतील. गृहस्थ भिक्षुक होतील, वानप्रस्थी गावात राहतील तर संन्यासी धनाचे लोभी होतील. मालक निर्धन झाला आणि जरी तो गुणवान असला तरी सेवक त्याचा त्याग करतील आणि मालकसुद्धा कुलीन सेवकावर आपत्ती आली असता त्याचा त्याग करतील. गायींनी दूध देणे थांबविल्यावर त्यांचा त्याग अथवा हत्या केली जाईल. कलियुगातील दीन आणि कामुक पुरुष स्त्रियांद्वारे नियंत्रित राहतील. आपले माता पिता, बंधू, इष्ट मित्रबांधवाना त्यागून उलट ते आपल्या पत्नीच्या बहीण-भावाबरोबर राहतील. अशा प्रकारे मैत्रीची त्यांची संकल्पना ही केवळ कामवासनेवरच आधारित असेल. असंस्कृत प्रवृत्तीचे लोक ईश्वराच्या नावाने दान स्वीकारून उदरनिर्वाहाकरिता तप करण्याचे नाटक करतील आणि साधूचा वेष धारण करतील.
धर्माचे काहीही ज्ञान नसणारे लोक व्यासासनावर बसून धार्मिक प्रवचने करू लागतील. कलियुगातील लोकांची मने सदैव व्यथित राहतील. दुष्काळ आणि करांच्या भारामुळे त्यांचे देह क्षीण होतील. त्यांच्याकडे पुरेशी वस्त्रे आणि अन्नधान्याची कमतरता असेल. मनुष्य व्यवस्थितपणे विश्रांतीही घेऊ शकणार नाहीत. लोक अन्न, वस्त्र, खाणे पिणे, अंथरूण पांघरुण, विषयसेवन, स्नान, अलंकार याना पारखे होतील. त्यामुळे लोक अगदी पिशाच्चाप्रमाणे दिसतील. कलियुगातील लोक पैशाच्या क्षुल्लक नाण्यावरून एकमेकांशी शत्रुत्व करतील. मैत्री, प्रेम वाऱयावर सोडून ते स्वतःचा जीवही गमावतील आणि स्वजनांचेही प्राण घेतील. पुरुष आपले वयोवृद्ध मातापिता, संतती अथवा कुलीन स्त्रियांची काळजी घेणार नाहीत. राजे नावाचेच लोक कल्याण करणारे असतील. त्यांचे आचरण म्लेच्छाप्रमाणे असेल. ते संस्कारहीन होऊन सत्कर्मे करणार नाहीत. त्यांच्या ठिकाणी राजस व तामस गुणांचे प्राबल्य असेल. त्यामुळे ते प्रजेला पिळून काढतील. अशा संस्कारहीन राजांच्या स्वामित्वाखाली वागणारे आणि त्या राजाचा स्वभाव व आचरण यांचे समर्थन करणारे त्या त्या देशातील एकमेकांकडून व त्यांच्या राजाकडून पिडले जाऊन नाशाप्रत जातील. कलियुगातील लोकांची बुद्धी नास्तिकवादामुळे मार्गभ्रष्ट होईल आणि ते सर्व देवदेवताही ज्या त्रैलोक्मयपती भगवंताच्या चरणी नतमस्तक होतात त्या अखिल लोकगुरु पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे पूजन करणार नाहीत.’ (जागेअभावी मूळ संस्कृत श्लोक येथे देता आले नाहीत.) वरील सर्व कलियुगाची लक्षणे ज्याची भविष्यवाणी 5000 वर्षांपूर्वी केली आहे, त्यातील बहुतेक लक्षणे आपण आज पहातच आहोत आणि पुढे तर परिस्थिती आणखीनच बिकट होत जाईल. त्यामुळे अशा परिस्थितीत ज्या ‘अच्छे दिन’ची आपण वाट पाहत आहोत ते केवळ एक मृगजळच ठरेल. पण ज्या भागवतमध्ये ही लक्षणे सांगितली आहेत त्याच ठिकाणी एवढे सर्व दोष कलियुगात असूनही एकमेव चांगला गुणही सांगितला आहे. त्या एकमेव चांगल्या गुणाचे जर प्रत्येकाने आपल्या जीवनात पालन केले तर कमीत कमी आपल्या आयुष्यात फरक पडेल आणि मध्वाचार्य, रामानुजाचार्य, शंकराचार्य, संत तुकाराम आणि वैदिक परंपरेशी प्रामाणिक असलेल्या इतर साधुसंतांनी याच मार्गाचे पालन करून आम्हालाही पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. श्रीमद भागवतमध्ये सांगितले आहे (12.3.51) कलेर्दोषनिधे राजन्नस्ति ह्येको महान् गुणः ।कीर्तनादेव कृष्णस्य मुक्तसङ्गः परं व्रजेत् अर्थात ‘हे राजन, कलियुग दोषांचा महासागर असूनही त्यात एक महान गुणही आहे, केवळ श्रीकृष्ण नामाचा जप केल्यास मनुष्य भवबंधनातून मुक्त होऊन वैकुंठलोकांची प्राप्ती करू शकतो.’ तुकाराम महाराजही कलियुगाचा युगधर्म सांगताना म्हणतात युक्ताहार न लगे आणिक साधनें । अल्प नारायणें दाखविलें 1 कलियुगामाजी करावें कीर्तन । तेणें नारायण देइल भेटी । न लगे हा लौकिक सांडावा वेव्हार । घ्यावें वनांतर भस्म दंड 2 तुका म्हणे मज आणि उपाव । दिसती ते वाव नामाविण 3 अर्थात युक्ताहारदिक काही साधने करावयास नकोत. नारायणांनी सोपा मार्ग दाखवला आहे. कलियुगामध्ये हरिनाम संकीर्तन केल्याने नारायणाची प्राप्ती होईल. त्यासाठी कोणताही लौकिक व्यवहार सोडण्याचे काहीच कारण नाही अथवा वनामध्ये जाऊन अंगाला राख फासून संन्यास दंड घेण्याची गरज नाही. एका भगवान श्रीकृष्णाच्या नामस्मरणावाचून इतर सर्व उपाय अपूर्ण आहेत.’ आपण प्रामाणिक असल्यास या जगात ‘अच्छे दिन’ ची अपेक्षाच करणे चुकीचे आहे कारण या जगाला मृत्युलोक म्हटले आहे. आयुष्यात जन्म मृत्यू जरा व्याधी येणार असतील तर चांगले दिवस कुठे आहेत? म्हणून हा मनुष्यदेह असेपर्यंत हरिनाम संकीर्तन केल्यास अपेक्षित असलेले ‘अच्छे दिन’ आपल्याला आध्यात्मिक जगतात प्राप्त होतील याची ग्वाही गीता भागवत आणि त्यातील उपदेशाचे पालन करणारे साधुसंत देत आहेत.
वृंदावनदास