सातारा पालिकेचे 307 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर,
पालिकेचे 2021-22 चे 307 कोटी 47 लाख 66 हजार 424 रुपयांचे बजेट उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी सभागृहात मांडले. नियमित कर भरणाऱया करदात्यांना करमाफ करण्याचा विषय यावेळी घेण्यात आला. किल्ले अजिंक्यताऱयाच्या विकासासाठी तसेच जुना राजवाडा येथे आर्ट गॅलरी विकसित करणे, अजिंक्यतारा स्मृती उद्यान नुतनीकरण आदी कामांसाठी तरतूद केली आहे, अशी माहिती उपाध्यक्ष मनोज शेंडे यांनी दिली. दरम्यान, हे बजेटमध्ये अनेक त्रुटी आहेत, असा आरोप सातारा विकास आघाडीचे नगरसेवक अण्णा लेवे, नगरविकास आघाडीचे नगरसेवक अशोक मोने, अविनाश कदम यांनी केला. तर नविआचे नगरसेवक शेखर मोरे यांनी सभात्याग केला.
नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेची अर्थसंकल्पीय सभा ऑनलाईन पद्धतीने पार पडली. या सभेला सुरुवातीला रेंज मिळत नव्हती. त्यामुळे उपाध्यक्ष मनोज शेंडे यांनी स्वतःची केबीन सोडून नगराध्यक्ष माधवी कदम यांचे केबीन गाठले. मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या केबीनमध्ये नगरसेवक अविनाश कदम, बाळासाहेब खंदारे हे बसले होते. तर निशांत पाटील, बाळासाहेब ढेकणे हे उपाध्यक्षांच्या केबीनमध्ये होते. झालेल्या सर्वसाधारण सभेपुढे सभा अधीक्षक हिमाली कुलकर्णी यांनी विषयांचे वाचन केल्यानंतर सभेला सुरुवात होताच उपाध्यक्ष शेंडे यांनी बजेट सादर केले.
या बजेटमध्ये कास धरणे उंची वाढवणे, भुयारी गटर योजना, घनकचरा व्यवस्थापन, अमृत योजना आदी योजना पूर्णत्वास येवू लागल्या आहेत. त्याच प्रमाणे अंजिक्यतारा किल्यांचा विकास करणे, जुना राजवाडा येथे आर्ट गॅलरी विकसित करणे, अजिंक्यतारा स्मृती उद्यान नुतनीकरण करणे, कर्नल संतोष महाडिक यांचे स्मारक उभारणे, नवीन प्रशासकीय इमारत बांधणे यांच्यासाठी तरतूद केली आहे. तसेच कोरोना तसेच दि. 7 सप्टेंबर 2020 च्या शासन निर्णयानुसार पालिकेची हद्दवाढ झालेली असून शाहुपूरी, दरे खुर्द ग्रामपंचायतीचा समावेश झाला आहे. तेथे पायाभत सुविधा देण्यासाठी तरतूद केली आहे. पालिकेचे कर्मचाऱयांचा सातवा वेतन आयोगाचा फरक, सानुग्रह अनुदान, कर्मचाऱयांना द्यावयाचे साहित्य, गणवेश वैद्यकीय प्रतीपूर्तीवरील खर्च 2021-22च्या अंदाजपत्रकांत तरतूद केली असल्याने सांगितले.
या अर्थसंकल्पामध्ये अनेक त्रुटी आहेत. 307 कोटी रुपये कसे खर्च करणार याचे पुरावे सादर केले तर बरे होईल अशी मागणी अण्णा लेवे यांनी केले. लेवे यांनी उत्तराची मागणी केली परंतु त्यावर उत्तर देता आले नाही. मोने यांनी मांडलेली उपसूचसना मंजूर करत नगराध्यक्षा माधवी कदम यांनी सभा संपली असे जाहीर केले. शेखर मोरे पाटील यांनी केला सभात्याग केला. अविनाश कदम यांनीही आक्रमकपणे मुद्दा मांडला.
उत्पन्नाच्या बाबी पुढीलप्रमाणे मालमत्ता कर 13 कोटी 75 लाख, पाणी कर 6 कोटी, विशेष स्वच्छता कर 1 कोटी 20 लाख, अग्निशमन कर 20 लाख, हद्दवाढ क्षेत्रातील महसूल 1 कोटी 75 लाख, इमारत भाडे व खुल्या जागा भाडे 1 कोटी 20 लाख, हातगाडा परवाना फी 26 लाख, नाटय़गृह भाडे 10 लाख, विकास कर 3 कोटी, प्रिमीयम 2 कोटी, मंडई फी 9 लाख, महसूली अनुदाने 34 लाख, 43 हजार, भांडवली अनुदाने 122 कोटी 70 लाख 10 हजार अशी आहेत. तर खर्चाच्या बाबीमध्ये कर्मचारी वेतन व भत्ते 23 कोटी 23 लाख 65 हजार, निवृत्ती वेतन 15 कोटी 10 लाख, सातवा वेतन आयोग फरक 3 कोटी 25 लाख, कार्यालयीन व प्रशासकीय खर्च 8 कोटी 46 लाख 10 हजार, देखभाल दुरुस्ती 7 कोटी 98 लाख 10 हजार, शिक्षण मंडळ अंशदान 3 कोटी, शासकीय कर्ज परतफेड 67 लाख, आरोग्य 7 कोटी 17 लाख, पाणी पुरवठा 3 कोटी 72, निवडणूक खर्च 1 कोटी 80 लाख, थोर व्यक्ती जयंती, वर्धापन दिन 40 लाख, पर्यावरण 5 लाख, दिव्यांग 39 लाख, मागासवर्गीय कल्याण 39 लाख, महिला व बालकल्याण निधी 39 लाख, भांडवली विकास कामे 202 कोटी, 78 लाख 8 हजार.
47 पैशाचे झाले 57 पैसे
पालिकेच्या बजेटच्या दोन पुस्तिका यावर्षी काढल्या गेल्या आहेत. भाग 1 आणि भाग 2 त्या अतिशय किचकट अशा आहेत. दरम्यान, पत्रकारांना रुपया कसा आला आणि कसा खर्च होणार याचा ताळेबंद असलेली माहिती पत्र दिले होते. त्यामध्ये उत्पन्नाच्याबाबीत 10 पैशाचा मेळ लागत नव्हता. ही बाब ‘तरुण भारत’ने नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या निदर्शनास आणून दिले. लेखा विभागाचे हिम्मत पाटील यांनाही निदर्शनास आणून दिली. त्यांनी प्रिटींग मिस्टेक असल्याचे सांगून भांडवली अनुदानात 47 पैशाच्या ऐवजी 57 पैसे असे करा, प्रिंटीग मिस्टेक झाली आहे असे सांगून तो बदल करण्यास सांगितले.