प्रतिनिधी / सातारा :
जिह्यात दि.22 रोजी झालेल्या मुसळधार पावसाने जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या तलावाची हानी झालेली आहे. गावपातळीवरील ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या मोटारी व इतर नुकसान झालेले आहे. त्या योजना पुन्हा नव्याने कार्यन्वित करण्यासाठी महावितरण आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तत्परतेने काम हाती घ्यावे, अशा सुचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुलें यांनी दिल्या. तसेच प्रत्येक गावात सॅनिटरी नॅपकिन एटीएम मशिन बसवण्याच्या विषयावर खल झाला असून येत्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चर्चा होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीची व स्थायी समितीची बैठक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, महिला बालकल्याण सभापती सोनाली पोळ, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
सुरुवातीला झालेल्या जलसंधारणच्या बैठकीत सध्या जिह्यात पावसाने अतोनात हानी झालेली आहे. यामुळे ग्रामीण पाणी योजनांची बरेच नुकसान झाले असून त्या पुन्हा कार्यन्वित करुन पाणी पुरवठा सुरळीत करण्याकरिता तातडीने पाणी पुरवठा विभाग व महावितरणने काम हाती घ्यावे, असे आदेश दिले गेले. तसेच लघु पाटबंधारे विभागाचे ज्या तलावाचे नुकसान झाले आहे. त्या तलावाची डागडुजी कशी करता येईल याकरिता 49 लाख रुपयांची तरतूद करण्याच्या सुचना दिल्या असून त्यांनी घेतलेल्या आढाव्यात 3 कोटी 62 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे अभियंत्यांनी सांगितले.
उदयसिंह उंडाळकर यांनी काही तलावांवर झाडी वाढली आहे. ती काढण्याकरता पाहणी करण्यात यावी, अशी मागणी केली. मस्त्य व्यवसायाकरता निधी असतो त्यातुन लपाचे तलाव दुरुस्ती करण्याची सुचना मांडण्यात आली. तसेच नाविण्यपूर्ण योजनेतून सॅनिटरी नॅपकिन एटीएम मशिन बसवण्याकरता चर्चा झाली.
रुग्णवाहिकेवरुन दीपक बापूंचा सवाल
रुग्णवहिका या कोणत्या आमदार फंडातून घेतल्या आहेत अध्यक्षांनी जाहीर करावे. साताऱयाचे आमदार सांगतात की त्यांच्यामुळे रुग्णवाहिका आल्या, असा सवाल दीपक पवारांनी करताच अध्यक्ष उदय कबुले यांनी बापु तसा काही प्रकार नाही. सर्व रुग्णवाहिका या जिल्हा परिषदेच्या फंडातून घेतल्या गेल्या आहेत, असे स्पष्ट केले. तसेच जिल्हा परिषदेचे जे रस्ते पावसाने खराब झाले, वाहुन गेले त्याच रस्त्याच्या कामासाठी 50 लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून ती कामे करण्याच्या सुचना अध्यक्षांनी दिल्या आहेत. तसेच समाजकल्याण विभागाकडील 2021-22 च्या प्रशासकीय कामांना मंजूरी देण्यात यावी, असा मुद्दा मांडताच समाजकल्याण सभापती कल्पना खाडे यांनी पहिल्या यादीला मंजूरी दिली गेली आहे. दुसरी यादी मंजूर करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.