अहल्या पतिव्रता असूनही एका बेसावध क्षणी ती गौतमवेशातील इंद्राला भुलली. गौतमांच्या तिच्यावरील विश्वासाला तडा गेला. तिला कितीही आणि कोणतीही शिक्षा केली तरी गौतमांचा क्रोध शांत होणार नव्हता. विश्वासाला तडा गेला की, संशयाचे भूत प्रबळ होते. पति-पत्नी म्हणजे दम्पती! घराचे समान अधिकाराचे स्वामी. पति-पत्नीचे मधुर नाते एकमेकांवरील अतूट विश्वासानेच टिकून राहते. ते नसेल तर संसार विस्कटून जातो. अहल्येवरील अविश्वासामुळेच गौतमांनी दिलेल्या शापामुळे तिला राखेत गाडून घ्यायची वेळ आली. तिच्या जन्मजात सौंदर्यानेच तिला माणसातून उठवले. या अहल्याकथा आणि गौतमांच्या शापाची कहाणी वेगवेगळय़ा प्रकारे प्रत्येक पुराणाने सांगितली आहे. मात्र अहल्येच्या शिळा होण्याची नोंद फक्त स्कंदपुराणात आहे.
गौतमांना अहल्येला संपवायचे नव्हते, तर तिला शुद्ध करून घ्यायचे होते. त्यांना हजारो वर्षांनी ती हवी होती, ती शुद्ध अहल्या. तपस्येने परिष्कृत आणि परिमार्जन केलेली अहल्या त्यांना धर्मपत्नी म्हणूनच हवी होती. रामावतारापूर्वीच गौतम तिला शुद्ध करून घेण्याची योजना करतात. इथेच त्यांच्या रास्त क्रोधाइतकीच क्षमाशीलताही दिसते. ते आपल्या भ्रष्ट पत्नीचा पूर्ण त्याग न करता तिला शिक्षा आणि शुद्ध होण्याची संधी देतात. त्यामुळे ते वंदनीय ठरतात. रामाने तिचा उद्धार केल्यानंतर ते आपल्या पत्नीचा संपूर्ण त्याग न करता उदार मनाने तिचा पुनश्च स्वीकार करण्याचे आश्वासन देतात. दांपत्य जीवनाचे खरे सार म्हणजे ही गौतम-अहल्येची कथा होय!
अहल्येची सर्व कथा सांगितल्यावर विश्वामित्रांनी रामाला अहल्या उद्धार करण्यास सांगितले. रामदर्शन होईपर्यंत त्रैलोक्मयात कोणालाही ती दर्शन दुर्लभ होती. पण रामाचा पदस्पर्श झाल्यावर ती सर्वांना दिसू लागली. तेव्हा राम लक्ष्मणांनी आनंदाने तिचे पाय धरले. परंतु गौतमांच्या सांगण्यावरून तिनेही त्यांचे चरणस्पर्श करून त्यांना अभिवंदन केले. त्यानंतर तिने रामाचे यथाविधी आदरातिथ्य केले आणि श्रीरामाने त्याचा लक्ष्मणासह स्वीकार केला. मग काय सारेच गोड!