(अध्याय तिसरा)
मायेच्या तावडीतून निसटून भवसागर तरून जाण्यासाठी सद्गुरुंना शरण जा, त्यांनी केलेल्या उपदेशाचे तंतोतंत पालन करा असे सगळे संत महात्मे सांगतात. सद्गुरु कुणाला म्हणावे? तर जो आपल्या शिष्याला आदराची वागणूक देऊन त्याचे सर्वथैव कल्याण करू इच्छितो त्याला! असा सद्गुरु मिळणे हे फार भाग्याचे लक्षण आहे. अत्यंत सुदैवाने अशा सद्गुरुची प्राप्ती झाल्यावर शिष्यानेसुद्धा त्यांच्या कसोटीला उतरणे आवश्यक आहे. अर्षभ प्रबुद्ध सत्शिष्य कसा असतो ते सांगत आहेत. ते म्हणाले, ‘सत्शिष्य हा निष्कपट बुद्धीचा, शुद्ध सत्त्वगुणी, परमार्थ साधनेची आस असलेला असतो. येथे ‘आस’ या शब्दाला विशेष महत्त्व असून, आस म्हणजे फक्त उद्दिष्टय़ वस्तूच हवी दुसरे तिसरे काहीही नको. इथे ही पण जाणीव असते की, आपण ती वस्तू मिळवायला पात्र नसू कदाचित, पण वस्तू मात्र तीच हवी हे नक्की. तर अशी आस बाळगून असल्यामुळे सद्गुरु हे त्याचे जीव की प्राण असतात. त्यांच्या वाक्मयाच्या पलीकडे तो रेसभरही सरकत नाही. त्याच्या गुरुसेवेत अजिबात अंगचुकारपणा नसतो. गुरु आणि ब्रह्म दोन्ही एकच आहेत असे तो मानतो. त्यामुळे सद्गुरु फार संतुष्ट होतात आणि शिष्यावर भुलून त्याच्या आधीन होतात. येथे कृष्णार्जुनाचे उदाहरण आपल्या डोळय़ासमोर आहेच. याकरता सर्वभावे सद्गुरुला शरण जावे, म्हणजे तो प्रसन्न होऊन शिष्याला भजनधर्माचा उपदेश करतो. श्रीनाथमहाराज आपल्याला त्यांच्या भागवतातून सत्शिष्य होण्यासाठी आपण सुरुवात कशी करावी, त्यात पुढे प्रगती कशी होईल याचे टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन करणार आहेतच. सद्गुरुंचे शिष्यावर पुत्रवत प्रेम असते, त्याची आध्यात्मिक प्रगती पाहून ते अतिशय समाधानी होतात आणि त्याच्या अगदी अधीन होतात. हाच अनुभव जे भगवत भजन करतात त्यानाही येतो. त्यांचा स्वामीही असाच सेवकाजवळ सदैव पहारा देत असतो. भोळय़ाभाबडय़ा लोकांसाठी तर ही पर्वणीच आहे. असे अनेक भजन करत करत उत्तम भक्त झालेले आहेत. नाथ महाराज म्हणतात, त्यासाठी सत्संगती हा पाया आहे.
अर्षभ प्रबुद्ध पुढे राजाला सांगतात, ‘राजा सत्संगाचा उपयोग विषयापासून विरक्ती साधण्यासाठी होतो. म्हणून असंग सोडून द्यावा. पहिली दृढ असंगती कोणती तर हा देह म्हणजेच मी ही समजूत! ती पूर्णपणे मनातून काढून टाकावी. मग सत्संगती म्हणजे कुणाची संगत धरावी, तर जेथे दया, मैत्री आणि विनय ही तीन लक्षणे दिसतात, त्यांची संगती करावी. अशी लक्षणे संतांच्यात पूर्णपणे दिसतात. त्यांच्या पूजनाने देवाधिदेव संतुष्ट होतो. त्यांच्या पूजनाने आपल्या अंगी विनय भाव दाटून येतो. संतांची वर्तणूक पाहून आपल्या अंगीही असेच गुण असावेत हा भाव मनात उपजतो.’ सत्संगतीचे महत्त्व सांगितल्यावर मुख्य परमार्थ साधण्यासाठी शुचिर्भूतपणा आवश्यक आहे असे सांगून ते पुढे म्हणाले, ‘अंतःकरणात दाटलेली वासनेची मलीनता घालवण्यासाठी गुरु वाक्यावरील निष्ठा उपयोगी येते. सोने जसे मुशीत घातले की शुद्ध होते, तसेच गुरुंच्या सांगण्याप्रमाणे वागले की अंतःकरण शुद्धी होते.
क्रमशः