ये-जा करणे बनले मुश्कील : प्रशासनाच्या अयोग्य कारभाराबद्दल संताप
प्रतिनिधी /बेळगाव
खानापूर रोडवर एका बाजूला जलवाहिन्या घालण्यासाठी बसवेश्वर चौकात खोदाईचे काम सुरू असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. तर दुसऱ्या बाजूला अनगोळ नाका येथे चर खोदून पाईप घालण्यात आल्याने वाहनधारकांना ये-जा करणे मुश्किल बनले आहे. सार्वजनिक बांधकाम खाते आणि एल अॅण्ड टीच्या कामामुळे शहरवासियांचे हाल होत आहेत. प्रशासनाच्या अयोग्य कारभाराबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.
रस्त्यावर खोदाई करणे किंवा जलवाहिन्या घालण्यासाठी रस्ता बंद करण्यापूर्वी सर्वसामान्य नागरिकांना पूर्वसूचना देवून पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम खात्यासह एल अॅण्ड टीच्या अधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केले आहे. याचा फटका शहरवासियांना बसत आहे. 24 तास पाणीपुरवठा योजनेंतर्गत खानापूर रोडवर मुख्य जलवाहिनी घालण्याचे काम सुरू आहे. दत्त मंदिर ते बसवेश्वर चौकापर्यंत रस्त्यावर जलवाहिनी घालण्यासाठी खोदाई करण्यात आल्याने शुक्रवारपेठकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. वाहतूक वळविण्याच्या दृष्टीने किंवा वाहनधारकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने एल अॅण्ड टी कंपनीने कोणतीच खबरदारी घेतली नव्हती. त्यामुळे चौकात वाहतूक केंडीच्या समस्येला तेंड द्यावे लागत आहे.
प्रलंबित कामे त्वरित करा
यापाठोपाठ आता अनगोळ नाका परिसरात खानापूर रोडवर चर खोदून पाईप घालण्यात आली आहे. या रस्त्याचा विकास करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यातंर्गत निधी मंजूर झाला आहे. हे काम अधिवेशनापूर्वी सुरू करण्यात आले होते. पण अधिवेशनाच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांसह विविध खात्याचे मंत्री व अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी हे काम थांबविण्यात आले होते. तसेच खोदण्यात आलेल्या चरी बुजवून डांबरीकरण करण्यात आले होते. आता या रस्त्याच्या विकासाचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. त्याकरिता अनगोळ नाका येथे विविध वाहिन्यांकरिता मोठ्या आकाराचा पाईप घालण्यात आला. याकरिता रस्त्यावर खोदाई करण्यात आली.
पाईप घातल्यानंतर चर बुजविण्यात आली. पण मातीचे ढिगारे तसेच ठेवण्यात आले. त्यामुळे या रस्त्यावर वाहनधारकांना अडचण निर्माण झाली आहे. वाहनधारकांना रस्त्यावरून ये-जा करणे कठीण बनल्याने संताप व्यक्त करण्यात आला. मातीच्या ढिगाऱ्यावरून वाहने कशी चालवायची? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. या रस्त्यावर निर्माण झालेल्या समस्येचे निवारण करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात व प्रलंबित राहिलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी होत आहे.