ट्रॅक्टरचालक सुसाट, पोलीस निवांत, प्रवासी मात्र धोक्यात : शिस्त लावण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांतून क्षमतेपेक्षा अधिक वजनाची वाहतूक केली जात आहे. त्यामुळे इतर वाहनांना आणि प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. विशेषत: टॅक्टर चालकांकडून ही धोकादायक वाहतूक होत आहे. त्यामुळे शेजारून जाणाऱ्या प्रवाशांच्या जीवाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टरचालक सुसाट आणि पोलीस प्रशासन निवांत, अशी परिस्थिती पहावयास मिळत आहे.
ग्रामीण भागातील बेळगाव-वेंगुर्ला, बेळगाव-हंदिगनूर, बेळगाव-मच्छे, बेळगाव-बेळगुंदी आदी मार्गांवर ही धोकादायक वाहतूक वाढली आहे. साखर कारखान्यांच्या गळिताला जोर आल्याने ऊस वाहतूक वाढली आहे. मात्र क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक केली जात असल्याने विद्यार्थी, वाहनधारक आणि प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
उसाची वाहतूक टॅक्टर आणि ट्रकमधून केली जात आहे. विशेषत: डब्बल ट्रॉलीच्या माध्यमातून ऊस वाहतूक केली जाते. दरम्यान, चढतीला
ट्रॅक्टरची दोन्ही चाके हवेतच असतात. अशा परिस्थितीत वाहतूक सुरू आहे. दरम्यान, अशा धोकादायक वाहतुकीमुळे ट्रॉली कलंडण्याचे प्रकार वाढले आहेत. परिणामी यापूर्वी उसाच्या ट्रॉलीखाली सापडून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अशा धोकादायक ऊस वाहतुकीला शिस्त लावावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
ट्रॉल्या कलंडण्याचे प्रकार वाढले
बेळगाव, हंदिगनूर मार्गावर राजगोळी येथील साखर कारखान्याकडे वाहतूक करणाऱ्या टॅक्टरांची संख्या वाढली आहे. दरम्यान, मार्गावर असलेल्या चढतीवर या ट्रॅक्टरांची दोन्ही चाके उचलूनदेखील वाहतूक सुरू असल्याचे दिसत आहे. या मार्गावर अगसगा क्रॉस आणि बोडकेनहट्टी गावाजवळ मोठे चढाव आहेत. या ठिकाणी ट्रॉल्या कलंडण्याचे प्रकार वाढले आहेत. दरम्यान, अशा अपघातात जीव जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना वेळीच आवर घालणे आवश्यक आहे.
रात्री ऊस वाहतूक करावी
ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर शाळेच्या समोरच थांबविले जात आहेत. दरम्यान ऊस खाण्यासाठी मुले ट्रॉलीवर लोंबकळत आहेत. त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या टॅक्टर चालकांनी रात्री उशिरा ऊस वाहतूक करावी.
– गुंडू पाटील (हंदिगनूर हायस्कूलचे शिक्षक)