प्रतिनिधी /बेळगाव
शहरात खड्डय़ांची संख्या वाढली आहे. पावसाळय़ात खड्डय़ात पाणी साचून रस्त्यावरच तळी निर्माण झाली आहेत. त्यामुळे वाहनधारकांना खड्डय़ांतून मार्ग काढणे कठीण बनले आहे. येथील अनगोळ मेन रोडवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना समस्या निर्माण झाली आहे.
रस्त्यावर पावसाळय़ात पाणी साचते. त्यामुळे वाहनधारकांना खड्डा कोणत्या ठिकाणी आहे समजत नसल्याने खड्डय़ात दुचाकी अडकत आहेत. तसेच रात्री या मार्गावर अंधाराचे साम्राज्य असल्याने अपघातही होत आहेत.
सध्या येथील रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून वाहनधारकांना खड्डय़ातून वाट काढताना कसरत करावी लागत आहे. आधीच पावसाळय़ाचे दिवस असल्याने वाहने घसरून पडण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. येथील खड्डय़ांची त्वरित डागडुजी करावी अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.