प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्हा प्रशासनाने विकेंड लॉकडाऊन जाहीर केला. शनिवारी सकाळी 6 पासून सोमवारी सकाळी 6 पर्यंत पूर्ण लॉकडाऊनचे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी अनगोळ परिसरातील सर्व व्यावसायिकांनी आणि नागरिकांनी केली असून अनगोळ परिसरातील मुख्य रस्त्याबरोबरच इतर रस्त्यांवर संपूर्ण शुकशुकाट पसरला होता.
अनगोळ व उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. अनगोळच्या अनेक वसाहतींमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे साखळी तोडण्यासाठी स्वयंस्फूर्तीने सर्वांनी विकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली आहे. नेहमी अनगोळच्या मुख्य रस्त्यावर वर्दळ असते. मात्र शनिवारी औषध दुकाने वगळता इतर दुकाने बंद होती. जनतेने स्वतःहूनच याची काळजी घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले.
धर्मवीर संभाजी चौक येथे नेहमीच नागरिकांची वर्दळ पाहायला मिळते. मात्र, केवळ औषध दुकाने व दवाखाने वगळता सर्व दुकाने बंद होती. दूध विपेत्यांनी सकाळीच दूध विक्री करून बंद पाळला होता. त्यामुळे संपूर्ण गावामध्ये शुकशुकाट पसरला होता.
उद्यमबाग रस्त्यावरही शुकशुकाट
वडगाव, येळ्ळूर, धामणे या परिसरातील वाहनचालक व कामगार अनगोळमधून ये-जा करत असतात. उद्यमबाग येथील चौथ्या रेल्वेगेटमधून कामगारवर्ग मोठय़ा संख्येने जात असतो. मात्र, शनिवारी कामगारांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले.
जनजागृतीमुळे जिल्हा प्रशासनाला सहकार्य
गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिकेने या परिसरात जनजागृती केली होती. कोरोनाचे रुग्ण अधिक आहेत, तेव्हा गांभीर्याने लॉकडाऊन पाळा, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जनतेने लॉकडाऊन पाळून जिल्हा प्रशासनाला सहकार्य केले आहे.