कोळंबी प्रकल्पाबाबत आचरा ग्रामस्थांनी वेधले आमदार नाईकांचे लक्ष
प्रकल्पप्रश्नी जिल्हाधिकाऱयांची भेट घेण्याची आमदारांची ग्वाही
प्रतिनिधी / आचरा:
आचरा पारवाडी हद्दीत सुरू असलेल्या कोळंबी प्रकल्पामुळे पारवाडी, डोंगरेवाडीतील शेतकऱयांच्या शेकडो एकर शेतजमिनीत खारे पाणी शिरून शेतजमिनी व वाडीतली पिण्याच्या पाण्याच्या विहिरी दूषित होत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी प्रकल्पाविरोधात ग्रामसभेत आवाज उठवला होता. शनिवारी आचरा दौऱयावर आलेल्या आमदार वैभव नाईक यांची पारवाडी डोंगरेवाडी ग्रामस्थांनी भेट घेत प्रकल्पप्रश्नी लक्ष वेधले. नाईक यांनी प्रकल्पाबाबत निर्माण झालेल्या अडचणींवर चर्चा करत माहिती जाणून घेतली. त्यांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱयांची ग्रामस्थांसमवेत भेट घेऊन त्यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले.
मालवण शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, जगदिश पांगे, आचरा डोंगरेवाडीचे सुपुत्र आबा दुखंडे तसेच पारवाडी डोंगरेवाडीतील ग्रामस्थ सचिन परब, रवींद्र बागवे, परशुराम शेटये, राजू नार्वेकर, सचिन दुखंडे, दीपक गावडे, प्रदीप केळकर, रवींद्र केळकर, बापू कदम, भिकाजी कदम, महेंद्र राणे, अनंत परब, श्रीपाद सावंत, सचिन बागवे आदी उपस्थित होते.
..तर पुढील 10 वर्षे भोगावा लागणार परिणाम!
पारवाडी ग्रामस्थ आपली बाजू आमदार नाईक यांच्याकडे मांडताना म्हणाले, या प्रकल्पामुळे यापूर्वीही आचरा पारवाडीला पुराचा सामना करावा लागला आहे. यात घरदारेही वाहून गेली. नंतर हा प्रकल्प बंद करण्यात आला होता. आता हा प्रकल्प गेल्यावर्षीपासून सुरू करण्यात आला आहे. त्याचे दुष्परिणाम आता पुन्हा आम्हाला भोगावे लागत आहेत. या भागातील जलस्त्राsत दूषित करून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या भागातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरींचे पाणी पूर्णत: दूषित झाले आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार, असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. हा प्रकल्प एप्रिलपर्यंत बंद न झाल्यास या भागातील विहिरींचे पाणी मोठय़ा प्रमाणात दूषित होणार असून याचा परिणाम पुढील 10 वर्षे भोगावा लागणार असल्याने हा प्रकल्प बंद करावा, अशी मागणी आमदार नाईक यांच्याकडे उपस्थित ग्रामस्थांनी केली.
कांदळवन तोडले, खारलॅण्ड बंधाऱयावरही केलेय बांधकाम
हा प्रकल्प 35 एकरामध्ये आहे. प्रकल्पाच्या बाजूला असलेल्या खारलॅण्ड बंधाऱयावर प्रकल्पधारकाने अनधिकृत बांधकाम केले आहे. ग्रामस्थांचा ये-जा करण्याचा मार्गही बंद झाला आहे. प्रकल्पाच्या बंधाऱयाच्या भिंतीची उंची वाढवली आहे. त्यामुळे पारवाडीला धोका वाढला आहे. प्रकल्पधारकाने लगतचे कांदळवनही तोडून टाकल्याची माहिती नाईक यांना ग्रामस्थांनी दिली.
जिल्हाधिकाऱयांचे लक्ष वेधणार! प्रकल्पाची नुसती पाहणी करून हा प्रश्न सुटणारा नाही. यासाठी आपणास रितसर प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रकल्पामुळे उद्धवलेली स्थिती जिल्हाधिकाऱयांची ग्रामस्थांसवेत भेट घेऊन निदर्शनास आणून देणार असल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले. योग्य तो तोडगा निघेपर्यंत प्रकल्प सुरू करू न देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱयांनी द्याव्यात, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले. यासाठी आवश्यक कागदपत्रे घेऊन गुरुवारी जिल्हाधिकाऱयांची भेट घेण्याचे आमदार नाईक यांनी ग्रामस्थांशी बोलून निश्चित केले.