तीन महिन्यात एकही इमारत बांधकाम परवाना नाही : परवानगी देण्याच्या प्रक्रियेत 500 अर्ज : अर्ज निकालीसाठी कामाची गती वाढविण्याची गरज
प्रतिनिधी / बेळगाव
इमारत बांधकाम परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, लॉकडाऊन कालावधीत इमारत बांधकाम परवानगीचे काम रखडले होते. पण जून महिन्यापासून बांधकाम परवानगी देण्यास प्रारंभ करण्यात आल्याने सहा महिन्यांच्या कालावधीत 774 इमारत बांधकामधारकांनी बांधकाम परवानगीसाठी महापालिकेकडे अर्ज केले होते. यापैकी 250 इमारतींना बांधकाम परवानगी देण्यात आली असून, 24 इमारतींचा बांधकाम परवाना नामंजूर करण्यात आला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
कोरोना विषाणूंचा प्रसार झाल्याने लॉकडाऊन करण्यात आले होते. महापालिकेच्या अधिकाऱयांसह कर्मचाऱयांवर कोरोनाबाबत उपाय योजना राबविण्यासाठी जबाबदारी सोपविण्यात आली होती. महापालिकेचे कामकाज पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. नागरिकांनी महापालिकेत येण्यास बंदी घालण्यात आली होती. त्याचप्रमाणे सर्व ऑनलाईन प्रक्रिया बंद होती. त्यामुळे इमारत बांधकाम परवानगी विभागाचे कामही बंद होते.
तीन महिन्यांच्या कालावधीत एकही इमारत बांधकाम परवाना देण्यात आला नाही. मात्र अनलॉक झाल्यानंतर जूनपासून इमारत बांधकाम परवानगी देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. जूनपासून 15 डिसेंबरपर्यंत महापालिकेकडे 774 नागरिकांनी अर्ज करून बांधकाम परवानगीची मागणी केली आहे. यापैकी 250 इमारतींना बांधकाम परवाना मंजूर करण्यात आला आहे. तर 24 इमारतींची बांधकाम परवानगी नामंजूर करण्यात आली आहे. उर्वरित 500 अर्ज परवानगी देण्याच्या प्रक्रियेत आहेत. 500 पैकी 326 अर्जांबाबत ऑनलाईनद्वारा प्रक्रिया सुरू आहे.
इमारत बांधकाम परवानगी देण्यासाठी कागदपत्रांची पडताळणी, आवश्यक दाखले तसेच सेटबॅक आदींची पाहणी करण्यात येते. आराखडय़ाची पडताळणी करून नियमानुसार सेटबॅक सोडण्यात आले का? रस्त्याच्या रुंदी आणि भूखंडाच्या आकारानुसार इमारतीची उंची बरोबर आहे का? याचा सर्व तपशील पहावा लागतो. तसेच भूखंडांची प्रत्यक्ष पाहणी करून लांबी-रुंदी पाहण्यात येते. या प्रक्रियेत 326 अर्ज असल्याची माहिती नगर योजना विभागातील अधिकाऱयांनी दिली. 500 पैकी उर्वरित 174 अर्जांच्या इमारत बांधकाम आराखडय़ामध्ये काही त्रुटी आणि कागदपत्रांची कमतरता असल्याने सदर अर्जाबाबत बांधकामधारक व आर्किटेक्ट यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे सदर अर्ज प्रलंबित आहेत.
सहा महिन्यांच्या कालावधीत केवळ 774 इमारत बांधकामधारकांनी मनपाकडे अर्ज केले आहेत. वास्तविक पाहता शहरात असंख्य इमारतींचे बांधकाम सुरू आहे. उपनगर परिसरात इमारतींची दुरुस्ती, वरील मजल्यांचे बांधकाम करण्याची कामेही सुरू आहेत. मात्र या इमारतधारकांनी परवानगी घेतली की नाही, याबाबत कोणताच तपशील मनपाकडे उपलब्ध नाही. परवानगीसाठी केलेल्या अर्जांपैकी निम्म्यापेक्षा कमी अर्ज निकालात काढण्यात आले आहेत. त्यामुळे अर्ज निकालात काढण्यासाठी काम करण्याची गती वाढविण्याची गरज आहे.
तर अनधिकृत बांधकामाला ब्रेक
वाढते शहरीकरण आणि नागरिकांची गरज पाहून महापालिकेने कामकाजात बदल करून इमारत बांधकाम परवाने तातडीने देण्यासाठी कार्यवाही करण्याची गरज आहे. तातडीने परवाने दिल्यास विनापरवाना आणि अनधिकृत बांधकामाला ब्रेक लागण्याची शक्मयता आहे. अनधिकृत व विनापरवाना बांधकामावर नजर ठेवण्याची गरज आहे. पण याबबात महापालिकेकडून कोणतीच कार्यवाही केली जात नसल्याने विनापरवाना आणि अनधिकृत बांधकामांना ऊत आला आहे.