प्रतिनिधी / सातारा :
जिल्ह्यासह सातारा शहरामध्ये कोरोनाची परिस्थिती आता कुठे निवळू लागली आहे. सर्वसामान्य व्यापारी व नागरिक यांची आर्थिक घडी रुळावर येण्यापूर्वीच वीज वितरण कंपनीने वीज बिलांची वसुली सुरू केली आहे. सातारा शहरात वसुली मोहीम राबवली जात असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील वीजबिल भरण्यासाठी काही अवधी द्यावा, अशी मागणी होत असून त्याला वीज वितरण कंपनीने सकरात्मक प्रतिसाद घ्यावा. अन्यथा आंदोलन अटळ आहे, असा इशारा पाणी पुरवठा सभापती सीता राम हादगे यांनी कृष्णानगर, सातारा येथील वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मार्च 2019 मध्ये जिल्ह्यासह सातारा शहरात कोरोनाने शिरकाव केला. अल्पावधीत सातारा शहरात मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली. नाईलाजास्तव जिल्हा प्रशासनाला सातारा शहरातील सर्व दुकानांचे उद्योग-व्यवसाय, भाजी मंडई, सर्व प्रकारचे हॉटेल्स आणि व्यवसाय बंद ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा ठप्प झाल्यामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. सातारा औद्योगिक वसाहतीमध्ये विविध कंपन्यांपैकी अत्यावश्यक सेवामधील कंपन्या वगळता काही अटी व शर्तींवर अन्य कंपन्या सुरू करण्यास परवानगी दिल्यामुळे अनेक कामगारांची रोजीरोटी हिरावली गेली ही वस्तुस्थिती आहे. उद्योग बंद, दुकाने बंद, भाजी मंडई बंद, हाताला काम नाही. अशा परिस्थितीत नागरिक जीवन जगत होते हे वास्तव्य आहे. कोरोनाकाळातील टाळेबंदीमुळे सर्वसामान्य कुटुंबाचे आर्थिक गणित कोलमडले असतानाच वीज वितरण कंपनीने अचानक विज बिल भरा अथवा कनेक्शन कट करण्याची धडक मोहीम राबवली. मार्च महिन्यात विधिमंडळाच्या अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर कृषी पंप आणि घरगुती ग्राहकांच्या वीज तोडणीची कारवाई थांबविण्यात आली. मात्र अधिवेशनानंतर पुन्हा वीज तोडण्याची कारवाई सुरू करून वीज महामंडळाने सामान्य जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली. ती तात्काळ थांबून सर्वसामान्य नागरिकांना वीज बिले भरण्यासाठी काही मुदत द्यावी, अन्यथा वीज वितरण कंपनीच्या तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याची संपूर्ण जबाबदारी वीज वितरण कंपनी कार्यालयाची राहील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.